कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील हवेत दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. हवेतील कार्बन मोनॉक्साईड वायूचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा अधिक असल्याचे केआयटी कॉलेजच्या तपासणीत दिसून आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही घातक बाब असून,त्याचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. याबरोबरच शहरातील धूलिकणांचे प्रमाणही निर्धारित पातळीपर्यंत पोहचले आहे. सल्फरडाय ऑक्साईड आणि नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी आहे. जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच ठिकाणी चाचणी करण्यात आली. दरम्यान, हवा प्रदूषण नियंत्रण सामुदायिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.
केआयटी'च्या सिव्हिल अँड एन्व्हारयन्मेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने शहरातील हवेची तपासणी केली. रंकाळा स्टैंड, गंगावेस, महापालिका चौक, संभाजीनगर चौक, उमा टॉकीज चौक, केआयटी परिसर येथे तपासणी केली. त्यातून शहरातील हवेची शुद्धता धोक्याच्या पातळीकडे जात असल्याचे दिसून आले. हा उपक्रम केआयटी महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, विभागप्रमुख डॉ. ए. आर. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ जोशी, मनोज यादव यांनी केला. सोनल मनुस्मरे, आशितोष चव्हाण, मनमोहन पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या आहेत हवा शुद्धतेच्या उपाययोजना गरजेच्या-
शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाययोजना तज्ज्ञांनी सुचवल्या आहेत. शहरातील खुल्या जागा टिकवणे, इमारतींमधील अंतर योग्य ठेवणे, शहरामध्ये आणि शहराभोवती हरितपट्टे करणे, सुका कचरा जाळू न देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर अधिक करणे, स्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे, प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर निर्बंध आणणे, अवजड वाहनांच्या शहरातील वाहतुकीचे प्रमाण कमी करणे, शहरातील सर्व रस्ते पक्क्या स्वरुपातच असावेत असे उपाय सांगितले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद
हवा प्रदूषणाचा नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात जवळपास २५ कोटी इतक्या निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये हरित पट्टे तयार करणे, वने विकसित करणे, यासह आधुनिक प्रयोग/उपक्रम राबवणे याचा समावेश आहे.
हेही वाचा- वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात समोर आले मोठे खुलासे