औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Leader Raj Thackeray ) यांच्या सभेनंतर नियम मोडले म्हणून कारवाई करा, अशी मागणी केली जात आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी एमआयएमसह वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली असताना राज ठाकरे यांना अटक करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) वतीने ( RPI Demand to Action on Raj Thackeray ) केली आहे.
पोलीस आयुक्तांना दिले निवेदन - राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केलेले वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. त्यांनी मर्यादा सोडून भाषण केले आहे. त्यामुळे त्यांचे विरोधक कारवाईसाठी आग्रही झाले आहेत. त्यात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. त्या बाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना निवेदन देऊन तशी मागणी केली आहे.

पोलिसांची भूमिका चुकीची - 1 मे रोजी मनसेची सभा घेण्यात पोलिसांनी परवानगी दिली. मात्र त्यावेळी वंचितच्या वतीने शांती मार्च काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. इतकेच नाही तर वंचितच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचे काम करण्यात आले. सामाजिक शांती भंग करणाऱ्यांना परवानगी आणि शांतीसाठी काम करणाऱ्यांना अडवण्यात आले, हे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन पक्षाचे नेते फारूक अहमद यांनी केली आहे. तर आम्ही राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देणार आहोत, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशारा वंचितच्यावतीने देण्यात आला.