औरंगाबाद - चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर औरंगाबादेत गुरुवारी मॉल खुले करण्यात आले आहेत. शहरात असलेल्या एकमेव प्रोझोन मॉलने येणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष काळजी घेत मॉल सुरू केला आहे. येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणीसह आरोग्य तपासणी केल्यावरच नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे.
राज्य सरकारने दिलेल्या नियमानुसार चित्रपटगृह आणि उपहारगृह वगळता इतर सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांची काळजी घेत सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करूनच यापुढे मॉल सुरू राहतील. नो मास्क नो एन्ट्री अशी भूमिका घेतल्याची माहिती प्रोझोन मॉलतर्फे कमल सोनी यांनी दिली.
मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी असावी याकरिता मुख्य प्रवेशाला नागरिकांसाठी एक क्यूआरकोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करावा लागणार आहे. त्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आपलं नाव, मोबाईल आणि इमेल देणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी झाल्यावर ऑक्सिमीटर आणि शरीराचं तापमान तपासल्यावर नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यानंतर मॉलमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या दुकानात सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. दुकानात काम करणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी त्याचबरोबर त्यांनी कायम मास्क वापरने अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांनी मॉलमध्ये वावरताना मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती मॉल व्यवस्थापक कमल सोनी यांनी दिली.
गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद येथील मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार टप्प्याटप्याने अनलॉक होत असलं तरी मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र बंद ठेवण्यात आली होती. राज्य सरकारने नियम अटींना अधीन राहून मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार मॉलमध्ये असणारे सिनेमागृह आणि उपहारगृह वगळता इतर दुकानं उघडण्यात आली आहेत. येणाऱ्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी सर्व खबरदारी घेत असल्याची माहिती मॉल व्यवस्थापक कमल सोनी यांनी दिली आहे. मॉल जरी सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांनी देखील खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास टाळलं असल्याचं औरंगाबादेत पाहायला मिळालं.