औरंगाबाद - कोरोनाचे रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात वाढत असताना खासगी रुग्णालय मनमानी कारभार करत असल्याचा आरोप शहरातील लोकप्रतिनिधींनी केला होता. त्यानंतर खासदार - आमदारांसमोर बैठक घेत विभागीय आयुक्तांनी खासगी रुग्णालय प्रमुखांची कानउघाडणी केली.
खासगी रुग्णालयात यापुढे रुग्णांना दाखल करून घेत पाहिले उपचार सुरू करावेत. उपचार करत असताना वाढीव बिल आल्यास कारवाई करण्यात यायला हवी. इतकच नाही तर जास्तीचे घेतलेले पैसे रुग्णांना परत द्यायला हवे, अशी मागणी बैठकीला उपस्थित खासदार - आमदारांनी केल्याचे खासदार भागवत कराड यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना येणाऱ्या अडचणी बैठकीत समजून घेण्यात आल्या. महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मोफत उपचार व्हायला हवे, मात्र तसं होत नाही. रुग्णालयांना पाठवलेले प्रस्ताव मंजुर होत नाहीत. देण्यात येणाऱ्या 65 हजारात कोविडचे उपचार शक्य नसल्याचे भाजप खासदार भागवत कराड यांनी सांगितले.
रुग्णालयांना मिळणाऱ्या ऑक्सिजनचे दर दुपटीने वाढले आहेत. औषधी देखील महाग झाली आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. बायोवेस्ट उचलताना पंधरा हजार रुपये संबंधित एजन्सी लावत आहेत. अशा अनेक अडचणी आहेत. अशा समस्या खासगी रुग्णालयाच्या प्रमुखांनी बैठकीत मांडल्या. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आम्ही काही मुद्दे मांडले असून सरकारी रुग्णालयात महागाची औषधी बाहेरून आणायला सांगितलं जात आहे. याबाबत मुख्य सचिवांना माहिती दिली. त्यावर लवकरच औषधी उपलब्ध केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिल्याचे खासदार भागवत कराड यांनी सांगितले. भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांच्याशी विशेष बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.