अमरावती - कोरोनामुळे तब्बल दीड वर्ष बंद असणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये बुधवारपासून चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. राज्य शासनाने 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून ओस पडलेल्या अमरावती जिल्ह्यातील शाळांमध्ये ( Amravati district Primary school ) चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज झाले आहेत.
हेही वाचा - Gas Cylinder Explosion : वरळीत गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जखमींपैकी दोन गंभीर
शाळांमध्ये सफाई अभियान
बुधवारपासून शाळा सुरू होणार असल्याने अमरावती शहरासह जिल्ह्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेत आज सफाई अभियान जोमाने राबविण्यात आले. अनेक शाळेत वर्गखोल्या पाण्याने धुण्यात आल्या, डेक्स बेंच धुऊन पुसण्यात आले. वर्ग खोल्यांमध्ये सॅनिटायझर मारण्यात आले. चिमुकल्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी सर्वच शाळेचे व्यवस्थापन मंडळ काळजी घेताना आज दिसून आले.
शिक्षकांनी सजवल्या वर्गखोल्या
बुधवारी सकाळी विद्यार्थी वर्गात दाखल होणार असल्याने शहरातील अनेक शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या स्वागतासाठी वर्गखोल्या सजवल्या. वर्गातील फलकावर विविध म्हणी सुविचार लिहून विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. सकाळी विद्यार्थी वर्गात येतील तेव्हा फळांवरील सुविचारांसोबतच हार, फुले आणि फुग्यांनी वर्गखोल्या सजलेल्या त्यांना दिसणार आहेत.
कोरोना नियम पाळले जाणार
शासन आदेशानुसार कोरोनाचे नियम बाळगूनच अमरावती जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. एका बेंचवर एकच विद्यार्थ्याला बसवले जाणार असून, विद्यार्थ्यांना शाळेत डबा आणण्यास मनाई आहे. शाळा केवळ दोन तासच राहणार असून विद्यार्थ्यांना नाका तोंडाला मास्क लावणे सक्तीचे असणार आहे. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही? हा निर्णय पालकांना घ्यावा लागणार आहे.
अशी आहे जिल्ह्यातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संख्या
अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत एकूण 2 लाख 99 हजार 465 विद्यार्थी आहेत. यापैकी इयत्ता पहिलीत 36 हजार 631, इयत्ता दुसरीत 43 हजार 73, इयत्ता तिसरीत 44 हजार 219, इयत्ता चौथीत 43 हजार 259, पाचव्या इयत्तेत 44 हजार 95, सहाव्या इयत्तेत 44 हजार 64 आणि इयत्ता सातवीत 44 हजार 139 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - मोझरी उपसा सिंचनचे पाणी शिरले शेतकर्यांच्या शेतात, नुकसान भरपाईची मागणी