नवी दिल्ली – कोरोना महामारीत टाळेबंदी खुली होताना औद्योगिक आणि अर्थव्यवस्थेमधील मागणी हळूहळू वाढत आहे. त्यामुळे चांदीचे सप्टेंबरमधील सौद्याचे दर हे गेल्या सात वर्षात सर्वाधिक वधारले आहेत.
औद्योगिक कंपन्या आणि ज्वेलर्सकडून चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे चांदीचे दर वाढल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) चांदीच्या सौद्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपते. चांदीची सप्टेंबरमधील सौद्यांसाठी किंमत वाढून प्रति किलो 53,199 रुपये झाली आहे. हा सप्टेंबर 2013 नंतर चांदीला मिळालेला सर्वाधिक भाव आहे. ऑगस्टमध्ये सौद्याची मुदत संपणाऱ्या सोन्यासाठी किंमत प्रति तोळा 49 हजार 159 रुपये आहे.
हे आहे चांदीच्या दरवाढीचे कारण-
सोन्याचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील लोक चांदीच्या दागिन्याकडे वळले आहेत. चांगला मान्सून आणि ग्रामीण भागातून वाढलेली मागणी यामुळे चांदीची खरेदी वाढल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. साधारणत: सोन्याच्या भावातील चढ-उताराप्रमाणे चांदीवर तसाच परिणाम होतो. पण, सोन्याच्या भावातील घसरणीनंतरही चांदीचे दर वाढल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता असल्याने सोने व चांदीचे दर येत्या काळात वाढणार असल्याचा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तविला आहे.