नवी दिल्ली - टाळेबंदीत विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर इंडिगोने ९९.५ टक्के प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले आहेत. गतवर्षी मार्चमध्ये टाळेबंदी लागू केल्यानंतर विमान वाहतूक सेवा विस्कळित झाली होती.
इंडिगोने टाळेबंदीत रद्द झालेल्या विमान तिकिटापोटी प्रवाशांना १,०३० कोटी रुपये परत केले आहेत. हे प्रमाण एकूण रद्द झालेल्या तिकिटांच्या रकमेपैकी ९९.९५ टक्के आहेत. उर्वरित पैसे हे ग्राहकांकडून बँकेची माहिती मिळाली नसल्याने रखडले आहेत. इंडिगोचे सीईओ रोनजॉय दत्ता म्हणाले की, मार्चमध्ये टाळेबंदी केल्याने संपूर्ण विमान वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. तसेच विमान तिकिटांमधून मिळणाऱ्या रकमेवर परिणाम झाला होता. देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून मागणी वाढली आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा १४९ रुपयांची घसरण; चांदीचे दरही उतरले!
अनेक विमान कंपन्यांकडून प्रवाशांना मिळाले नाहीत पैसे
इंडिगोच्या प्रवक्त्याने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने विमान कंपन्यांना रद्द झालेल्या तिकिटांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रवाशांना पैसे करण्यात आले आहेत. अनेक विमान कंपन्यांनी टाळेबंदीदरम्यान रद्द झालेल्या विमान तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत केले नाहीत.
हेही वाचा-वर्षभरानंतर पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरात १८ पैशांची, डिझेलमध्ये १६ पैशांची कपात
सर्वोच्च न्यायालयासह डीजीसीएने हे दिले होते आदेश
ज्या प्रवाशांनी २४ मे २०२० पर्यंत विमान तिकीट आरक्षित केले आहेत, त्यांना तातडीने पैसे परत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विमान कंपन्यांना दिले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) १६ एप्रिलला विमान कंपन्यांना प्रवाशांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत आरक्षित केलेल्या विमान तिकिटांचा समावेश होता.