नवी दिल्ली – ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने देशात 20 हजार कर्मचाऱ्यांना हंगामी कामावर घेण्याचे जाहीर केले. या नोकऱ्या ग्राहक सेवा केंद्रात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
अॅमेझॉनने पुढील सहा महिन्यात ग्राहकांची मागणी वाढणार आहे, हे लक्षात घेवून 20 हजार कर्मचारी सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद, पुणे, कोईम्बुतर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मनागलुरू, इंदूर, भोपाळ आणि लखनौमधून ग्राहकांची उत्पादनांना मागणी वाढेल, असा कंपनीचा अंदाज आहे.
या नोकऱ्या ग्राहकांना ऑनलाईन सेवा देण्यासाठी (व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस) देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना घरातूनही काम करण्याचा पर्याय असणार आहे. हे कर्मचारी ग्राहकांना ई-मेल, चॅट, समाज माध्यम आणि फोनवरून सेवा देणार आहेत. कमीत कमी बारावी पास उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रभुत्व असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरून हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
अॅमेझॉन इंडियाचे संचालक (ग्राहक सेवा) अक्षय प्रभू म्हणाले, की ग्राहकांची मागणी वाढत असल्याने आम्ही जागा भरण्यासाठीच्या प्रक्रियचे सतत मूल्यांकन करत आहोत. कोरोनाच्या अनिश्चिततेच्या काळाता हंगामी जागांच्या नोकरीमुळे सुरक्षितता आणि उदरनिर्वाहाचे साधन मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी कंपनीने 2025 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली होती. तर मे महिन्यांत कंपनीने 50 हजार हंगामी नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले होते