नवी दिल्ली - सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियावर आर्थिक संकट असल्याने नामुष्की ओढवली आहे. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एअर इंडियाला करण्यात येणारा हवाई इंधनाच्या पुरवठ्यासह ६ विमानतळांवरील इंधन पुरवठा थांबवला आहे. एअर इंडियाने पैसे थकवल्याने तेल कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.
सरकारी तेल मार्केटिंग कंपनी (ओएमसी) इंडियन ऑईलने एअर इंडियाचा रांची, मोहाली, पाटना, विझाग, पुणे आणि कोचीन येथील विमानतळावरील हवाई इंधनाचा पुरवठा थांबविला आहे. याबाबत माहिती देताना इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याने सांगितले, की हा हवाई इंधनाचा पुरवठा गुरुवारी संध्याकाळी थांबविण्यात आला आहे. आम्ही एअर इंडियाशी संपर्कात आहोत. त्यातून मार्ग निघेल, अशी आशा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहे.
एअर इंडियाने तेल मार्केटिंग कंपन्यांना ६० कोटी रुपये दिले आहेत. विमान उड्डाण होण्यात अडथळा येवू नये, यासाठी परतण्याच्या ठिकाणावरून हवाई इंधन भरण्यात येत असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.