अहमदनगर - लॉकडाऊन काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अवाच्या सवा दराने वीजेची आकारणी झाल्याने शेवगाव येथील सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एम. एस. सी. बीच्या तालुका मुख्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली. वाढीव बिले माफ करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आज फक्त वीजबिले जाळली, जर वीजबिले माफ केली नाही, तर भविष्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षातर्फे देण्यात आला. वाढीव वीज बिलांमुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व प्रा. एन. डी. पाटील यांनी वीज बिलांविरोधात आंदोलनाचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने सोमवारी (13 जुलै) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगाव येथे वीजबिलांची होळी केली. महावितरणच्या प्रवेश द्वारासमोर प्रचंड नारेबाजी करत वीजबिलांची होळी करून आंदोलकांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात बाळासाहेब फटागंडे, दत्ताभाऊ फुंदे, संतोष गायकवाड, दादासाहेब पाचरणे, प्रशांत भराट सर, प्रविण म्हस्के, प्रशांत घुमरे, मेजर अशोक भोसले, अमोल देवढे, संदीप मोटकर, नानासाहेब कातकडे, यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.