जालना - दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व दूध खर्चाच्या तुलनेत भाव मिळावा, यासाठी बदनापूर तालुक्यातील कृषी पदवीधारक संघटनेच्या वतीने दूध फेकून न देता गरजुंना वाटप करून अभिनव आंदोलन करण्यात आले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी व हक्कासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनाही राज्यवापी आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर उतरली आहे. दुधाला शासनाकडून योग्य भाव मिळावा, यासाठी कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठे आंदोलन सुरू आहे. आंदोलनात राज्यातील विविध भागांमधील आंदोलक दूध सांडून व फेकून आंदोलन करत असताना बदनापूर तालुक्यातील आंदोलकांनी असा प्रकार न करता गरजुंना दूधवाटप केले आहे.
तालुक्यातील कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू गायकवाड, संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आगामी काळात दुधाची हीच स्थिती राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी युवाशक्तीने दिला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, राजेंद्र वैद्य, पवन कोल्हे, संदिप वैद्य, सचीन कुडंकर, विलास वैद्य, सुदाम वैद्य, शेख इरफान, साईनाथ खरात, सचिन कुंडकर, शंकर वैद्य, शेख इरफान,अमोल बनसोडे आदी उपस्थित होते.