डब्लिन - अबू झायेदने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर बांगलादेशने तिरंगी मालिकेतील साखळी सामन्यात आयर्लंडचा ६ गडी व ४२ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह बांगलादेशने तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. कारकिर्दीतील दुसराच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या अबू झायेदाला सामनावीरचा किताब देऊन गौरविण्यात आले.
पॉल स्टर्लिगने १३० धावांची शतकी खेळी केली. कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्डने ९४ धावांची खेळी करत पॉलला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी १७४ धावांची भागीदारी रचली. त्या दोघांच्या खेळीच्या जोरावर आयर्लंडने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २९२ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून अबू झायेद लक्ष्यवेधी कामगिरी करत ५८ धावात ५ गडी बाद करत आयर्लंडच्या फलंदाजीस खिंडार पाडले.
प्रत्युत्तरात तमिम इक्बाल (५७), लिटन दास (७६) आणि शकिब अल हसन (५०) या तिघांनी ठोकलेल्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेशने विजय मिळविला. आयर्लंडकडून बॉएड रँकिन याने ४८ धावा देत २ महत्वपूर्ण गडी बाद केले. इतर कोणत्याही गोलंदाजास चमक दाखविता न आल्याने आयर्लंडचा पराभव झाला.
या विजयासह बांगलादेशने चार सामन्यात तीन गुणासंह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविले. शुक्रवारी बांगलादेश आणि विंडीज यांच्यात अंतिम सामना होणार आहे.