मुंबई- अभियांत्रिकी, फार्मसी तसेच तंत्रनिकेतन आदी प्रवेशासाठी असलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढे ढकलण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठीची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. असे सामंत यांनी संगितले.
मागील काही दिवसांपासून राज्यात सीईटी सेलकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावेत, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे.