जळगाव- जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 15.01 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात 'निसर्ग' चक्रीवादळामुळे चांगला पाऊस झाला. त्यामुळे सिंचन प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. परंतु, आता पावसाने दडी मारली असून, प्रकल्प पूर्ण भरलेले नाहीत. जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा असल्याने काही भागात पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. तर अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहेत. तसेच 96 लघू प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1 हजार 427.51 दलघमी म्हणजेच, 50.40 टीएमसी इतका आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1 हजार 27.10 दलघमी म्हणजेच, 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 424.96 दलघमी म्हणजेच, 15.01 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.66 टीएमसी, गिरणा 7.00 टीएमसी, तर वाघूर धरणात 6.35 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.
वाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी 13 जुलैपर्यंत 154 मि.मी पाऊस पडला होता. तर यावर्षी आजपर्यंत 204 मि.मी पाऊस पडल्याने जळगाव शहरात सध्या तरी पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 106.38 दलघमी म्हणजेच 3.76 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर 96 लघू प्रकल्पात 38.55 दलघमी म्हणजेच 1.36 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठा असा:
जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा 65.35 टक्के, मंगरुळ 78.43 टक्के, सुकी 69.49 टक्के, मोर 62.25 टक्के, हिवरा 99.54 टक्के, तोंडापूर 58.92 टक्के, गुळ 57.23 टक्के, भोकरबारी 72.74 टक्के तर बोरी प्रकल्पात 72.74 टक्के पाणीसाठा आहे. या नऊ प्रकल्पांमध्ये पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यातच 50 टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त साठा झाला आहे.