श्रीनगर- बुधवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेक्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलाकडून करण्यात आला आहे. मात्र आमची मुले निर्दोष असून, त्यांना एका बनावट चकमकीमध्ये मारण्यात आल्याचं मृतांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. बारामुला परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी एका घराला घेराव घातला, यावेळी दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.
बारामुलामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहीती सुरक्षा दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी परिसरात मंगळवारी शोधमोहीम राबवली. दहशतवादी लपून बसलेल्या घराला जवानांनी घेराव घातला. जवानांकडून दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. मात्र दहशतवाद्यांनी शरण न येता जवानांवर गोळीबार सुरू केला, जवानांनी देखील अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर दिले. बुधवारी सकाळपर्यंत दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. गोळीबार थांबला तेव्हा या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. अशी माहिती सुरक्षा दलाने पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
दरम्यान एजाज मकबूल गनी, अथर मुश्ताक वानी आणि जुबैर अहमद लोणे अशी या मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्या घरच्यांना जेव्हा त्यांची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आले, तेव्हा मृतांच्या कुटुंबीयांनी जवानांसोबत वाद घातला, व आमचे मुले निर्दोष असून, बनावट चकमकीमध्ये त्यांना मारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.