चंदीगड- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात सतत टीका करणारे काँग्रेसचे असंतुष्ट नेते नवज्योत सिद्धू हे अडचणीत सापडले आहेत. त्यांनी सुमारे तब्बल ८.५ लाख रुपये वीज बिल थकविल्याचे समोर आले आहे. यानंतर नवज्योत सिद्धू यांनी इतर राज्यांच्या तुलनेने पंजाबमध्ये वीज बिलाचे दर जास्त असल्याचा सरकारवरच आरोप केला आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून नवज्योत सिद्धू यांनी अमृतरसरमधील त्यांच्या घराचे वीज बिल भरले नसल्याचे रिपोर्टमधून समोर आले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू हे काँग्रेसची सत्ता असलेल्या सरकारवरच टीका करताना हा रिपोर्ट आला आहे. माजी क्रिक्रेटपटू नवज्योत सिद्धू यांनी पंजाबमधील वीजेच्या संकटाला अकाली दल आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना जबाबदार धरले आहे.
हेही वाचा-इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तावर ड्रोनच्या घिरट्या; भारताने केला निषेध
पंजाबमध्ये आहे वीजेचे संकट
- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी वीजेचे उत्पादन कमी होत असल्याने जास्त वीजेचा वापर होणाऱ्या उद्योगांच्या वीजेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सर्व सरकारी कार्यालयांमध्ये वीजेचा योग्य वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केले होते.
- राज्यात वीजेची मागणी ही १४,५०० मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पीके जळून जात आहेत. अशा स्थितीत कृषी क्षेत्राला प्राधान्याने वीज पुरवठा करण्याची गरज पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.
हेही वाचा-सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत पुलवामामध्ये ४ दहशतवादी ठार
नवज्योत सिद्धू यांनी सरकारला दिला घरचा आहेर-
जर योग्य दिशेने जर काम केले असते तर पंजाबला वीज कपात करावी लागली नसती, असे मत नवज्योत यांनी व्यक्त केले होते. सिद्धू यांनी पंजाबचे मूळ मॉडेल वापरण्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आवाहन केले आहे. दिल्लीच्या मॉडेलची कॉपी केल्याने राज्य सरकारला फायदा होणार नाही, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. बादल सरकारमुळे पंजाबमध्ये वीजेचे दर जास्त असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला आहे. बादल सरकारने वीज खरेदी करण्याचा करार रद्द करण्यासाठी पंजाब विधानसभेत नवीन कायदा आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, नवज्योत सिद्धू यांनी थकविलेल्या वीजबिलामुळे विरोधी पक्षांना आयतेच कोलीत मिळाले आहे. कारण, पंजाबमध्ये वीज संकट निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.