नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगोल्याहून पश्चिम बंगालमधील शालीमार स्थानकापर्यंत चालणाऱ्या 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, तसंच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यावेळी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यावेळी मोदींनी शेतकऱ्यांना संबोधीत केले. किसान रेल्वे हे देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठीचे मोठे पाऊल आहे. यामुळे कृषी क्षेत्रात मोठा बदल होत आहे. यामुळे देशातील 80 टक्के लहान शेतकऱ्यांना मोठी मदत होईल, असे मोदी म्हणाले.
किसान रेल्वेची साप्ताहिक ट्रेन म्हणून ऑगस्ट मध्ये सुरुवात झाली. लोकप्रियता मिळाल्यानं आता आठवड्यातून तीन दिवस ही किसान रेल्वे धावते आहे. लॉकडाऊन दरम्यानही रेल्वे आणि शेती या दोन्ही क्षेत्रात काम सुरूच होते. या दोन्हींनी देशाच्या कानाकोपऱ्यात धान्य पोहोचविण्याचं काम केलं. 2020-21 च्या अर्थसंकल्पात किसान रेल्वेची घोषणा करण्यात आली होती.
21 नोव्हेंबरला सांगोला-शालीमार किसान रेल्वे सुरू झाली होती. फुलकोबी, शिमला मिर्ची, पान कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरची, कांदा इत्यादी भाज्या तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, सिताफळे यासारख्या फळांची वाहतूक ही गाडी करते आहे.
अखंड पुरवठा साखळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट -
भारत सरकारने फळ आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के अनुदान दिले आहे. पहिल्या किसान रेल्वेची सुरुवात यावर्षी ऑगस्टला देवळाली ते दानापूरपर्यंत झाली होती, पुढे ती मुझफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली. शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्याची वारंवारता आठवड्यातून तीन दिवस करण्यात आली. देशभरात कृषी उत्पादनांची जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी किसान रेलद्वारे हा प्रयत्न आहे. याद्वारे नाशवंत शेती उत्पादनांची अखंड पुरवठा साखळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा - यूपीत आता वाहनांवर जातीचा उल्लेख केल्यास जप्तीसह दंडही