नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत उड्डाणांमध्ये प्रवशांना जेवण दिले जाणार नाही. नागरी उड्डाण मंत्रालयाने ही माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेता मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दोन तासांपेक्षा कमी प्रवासादरम्यान विमानात जेवणाच्या व्यवस्थेवर बंदी घालण्यात आली आहे. प्रवाशांना विमानात कोणतेही अन्नपदार्थ दिले जाणार नाही. प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे. कोरोना व्हायरसमुळे नियमांमध्ये बदल केले आहेत. नियमांचे पालन न केल्यास विमानात प्रवेश मिळणार नाही. विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी तैनात आहे. मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे.
देशातील कोरोनाची स्थिती...
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूची 1,68,912 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1,35,27,717 वर पोहचली आहे. कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशात आतापर्यंत मृत्यूची संख्या 1,70,179 वर पोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 12,01,009 पर्यंत वाढली आहे. मृत्यू बाबतीत भारत जगातील चौथ्या क्रमांकावर आहे.
लसीकरण वेगाने सुरू...
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जात आहे. रुग्ण संख्या वाढत चालल्याने लसीची मागणी वाढत आहे. तुटवडा निर्माण झाल्याने अनेक लसीकरण केंद्रावरील लस देण्याची मोहीम ठप्प झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने स्पुतनिक-व्ही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
हेही वाचा - 'आयएनएस विराट' मोडीत; संग्रहालयात रुपांतराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली