नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी आता घराची वाट धरली आहे. ट्रॅक्टर, ट्रक, कार, जीप आणि टेम्पोचा ताफा महामार्गावरून पंजाब आणि हरियाणाकडे जाताना दिसत आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, यास गालबोट लागले. एका आंदोलकाचाही मृत्यू झाला. त्याचा परिणाम आता आंदोलनावर होताना दिसत आहे. दिल्लीच्या सीमेवरील स्थितीही तणावपूर्ण असून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सामानासहीत शेतकऱ्यांनी धरली घराची वाट -
काल रात्रीपासूनच महामार्गावर शेतकऱ्यांची वाहने मोठ्या प्रमाणात परत जाण्यात सुरूवात झाली होती. दिल्लीच्या टीकरी, सिंघू सीमेसह इतर जागांवरून शेतकरी ट्रॉलीत सामान भरून माघारी निघाले आहेत. या आंदोलनात सुमारे ३०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक आंदोलकही जखमी झाले. लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावणारे आणि हिंसाचार घडवून आणणारे संयुक्त किसान मोर्चातील आंदोलक नव्हते असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी लाल किल्ला आणि दिल्ली शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दिल्लीच्या सीमेवर आधी हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर होते. मात्र, आता आंदोलकांनी घराची वाट धरली आहे.
शेतकरी नेत्यांनी केला हिंसेचा निषेध -
आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा शेतकरी संघटना, आम आदमी पक्ष, कॅप्टन अमरिंदर सिंग, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी आणि संघटनांनीही निषेध नोंदवला. दोन महिने शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला आजच्या घटनांमुळे गालबोट लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, सरकारने शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन कृषी कायदे मागे घ्यावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले.