नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यासंदर्भात भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) एक पोस्टर जारी केले आहे. यात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या नेत्यांची चित्रे आहेत. मात्र, यात देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचा फोटो नसल्याने नव्या वादाला सुरवात झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी टि्वट करत केंद्र सरकार आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेवर टीका केली. 'हे फक्त निंदनीय नसून इतिहासाच्याही विरोधात आहे. भारतीय स्वातंत्र्याचा आवाज राहिलेले जवाहरलाल नेहरु यांना हटवून स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला जात आहे. परत एकदा भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) आपलं नाव खराब केलं आहे. आणि आता ही एक सवय बनत चालली आहे', असे टि्वट थरूर यांनी केले आहे.
शशी थरुर यांनी भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) जारी केलेल्या पोस्टरही टि्वट केले आहे. यात महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि वीर सावरकर यांचे चित्र आहे. मात्र, यात कुठेही नेहरुंचा फोटो दिसत नाही.
आझादी का अमृत महोत्सव -
भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्षं साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू केला होता, जो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
भाजपावर टीका -
या राजवटीत असे काही घडणे हे आश्चर्यकारक नाही, असे जयराम रमेश यांना म्हटलं. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका चतुर्वेदी स्वातंत्र्य भारताच्या निर्मितीमधील दुसऱ्याचे योगदान कमी लेखल्याने तुम्ही मोठे दिसणार नाही. प्रत्येकाचे योगदान स्वीकारल्यानंतरच स्वांतत्र्यदिनाचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल. भारताच्या पहिल्या पंतप्रधानावर वगळून भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) स्व:ताचा लहानपणा आणि असुरक्षितेची भावना दर्शवली आहे, असे प्रियंका यांनी म्हटलं.
हेही वाचा - मित्रांच्या एकाधिकारशाहीवर देश बोलतोय; मन की बातवरून राहुल गांधींचा निशाणा