नवी दिल्ली - उत्तराखंड राज्यात हिमस्खलन होऊन मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. या घटनेत आत्तापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून १७१ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात येत असून सुरक्षा दले, आपत्ती निवारण पथके, वैज्ञानिकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत या घटनेची माहिती दिली.
काय म्हणाले अमित शाह?
बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचे काम सुरू आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक सामान पोहचवण्यात येत आहे. केंद्र सरकार २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तराखंडला सर्व ती मदत करण्यात येत आहे. आयटीबीपीने घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून सुरक्षा दलाची विविध पथके दाखल झाली आहेत. एनडीआरएफच्या ५ तुकड्या, लष्कराच्या इंजिनियरिंग टीमसह ९ तुकड्या, नौदलाचे पथकही मदकार्यात व्यस्त आहेत.
बोगद्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी चिखल काढण्याचे काम सुरू आहे. शसस्त्र सीमा दलाची एक टीमही घटनास्थळी पोहचली आहे. राष्ट्रीय आणीबाणी व्यवस्थापन पथकाचीही बैठक झाली. पाच हेलिकॉप्टर मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. पुराच्या लोंढ्यामुळे तुटलेल्या ५ पुलांचे कामही सुरू करण्यात आले आहे.
मृतांना वाहिली श्रद्धांजली -
गृहमंत्र्यांनी दुर्घटनेची माहिती दिल्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनीट उभे राहण्याची सुचना केली. त्यानुसार सर्व संसद सदस्यांनी दोन मिनीटे उभे राहून मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच जखमी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.