शिलॉंग - राजधानी दिल्लीतील नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून झालेली हिंसा आणि तणाव निवळत नाही, तोपर्यंत ईशान्य भारतातील मेघालय राज्यामध्ये हिंसाचार पसरला आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. शिलाँग शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
![violence spread over caa in meghalaya](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6253894_dfsdf.jpg)
शुक्रवारी 'खासी स्टुडंट युनियन'च्या एका सदस्याचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी शिलाँग मार्केटमध्ये आणखी एक जणाचा मृत्यू झाला आहे. कायदा सुव्यवस्था ढासळल्याने सहा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक मेघालयाचे गृहसचिव सी. व्ही. डी. डेईंगडोह यांनी जारी केले आहे. ईस्ट जैतिया हिल्स, वेस्ट जैतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, राय भोई, वेस्ट खासी हिल्स आणि साऊथ खासी हिल्स या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा खंडित करण्याबरोबरच मेसेजिंग सेवेवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर देशातील विविध भागात अजूनही आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनादरम्यान हिंसाचार पसरल्याच्याही घटनाही घडल्या आहेत. दिल्लीमध्ये हिंसाचारात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आंदोलकांना नियंत्रणात आणतानाही अनेकांचा मृत्यू झाला आहे.