तिरुवअनंतपुरम - केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी दक्षिण भारतातील परिचारिकांच्या क्वारंटाईन आणि आयसोलेशन सुविधा सुधारण्याची मागणी केली आहे.
'केरळच्या सहा परिचारिका जसलोक रुग्णालयात काम करत आहेत. त्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. त्यांच्यावर मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर २४ परिचारिका ज्यापैकी १५ केरळच्या आहेत. त्यांना आयसोलेशनसाठी महापालिकेने हलविले आहे. या परिचािरिकांना चांगले जेवण, वेळेवर औषध मिळत असले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या ठिकाणी क्वारंटाईन आणि आयसोलेट करण्यात यावे. त्यांना ठेवण्यात येणारी जागा स्वच्छ असावी, वेगवेगळे प्रसाधनगृह असावे,' असे विजयन यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्राची एक प्रत माध्यमांना देण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि या परिचारिकांना योग्य सुविधा पुरवाव्यात, यासाठी पिनरयी विजयन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले. या परिचारिका कोरोनाच्या कठीण काळात पहिल्या फळीत काम करताहेत, त्यामुळे त्यांना विशेष सुविधा देण्यात याव्या, असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल, असेही त्यांनी उद्धव ठाकरेंना म्हटले आहे. यापूर्वी सहा एप्रिलला विजयन यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले होते.