मुंबई- एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांच्या हात असल्याच्या आरोपांतर्गत अटकेत असलेले तेलगु कवी वरवरा राव यांनी तब्येत बरी नसल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने वरवरा राव कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वयोवृद्ध असल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुंबई उच्च न्यायलयात म्हटले.
वरवरा राव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचार करण्याची गरज नाही, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने 16 जुलै रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वरवरा राव यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वरवरा राव ज्या प्रकरणात अटकेत आहेत त्याचे स्वरुप पाहिल्यास आरोग्याविषयक अडचणींमुळे जामीन देऊ नये, असे एनआयएने म्हटले. राव यांना जे. जे.हॉस्पिटलमध्ये 28 मे रोजी दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना 1 जूनला डिस्चार्ज देण्यात आला. राव यांच्यावर सध्या नानावटी रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु आहेत.
राव यांचे वकील सुदीप पासबोला यांनी राव हे मृत्यूशय्येवर आहेत. राव यांची प्रकृती स्थिर नाही याबद्दल एनआयएने कोणाताही आक्षेप घेतलेला नाही. त्याची प्रकृती गंभीर आहे. कोरोनासोबत ते इतर आजारांशी झगडत आहेत. वरवरा राव यांची प्रकृती गंभीर असून ते जीवनातील शेवटचे दिवस त्यांच्या घरी असावेत आणि त्यांचा मृत्यू किमान घरातील व्यक्तींसमोर व्हावा, यासाठी न्यायलयाने जामीन मंजूर करावा अशी विनंती केली.
सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सरकारची बाजू मांडली. 20 जुलै रोजी वरवरा राव यांना नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राव यांना त्यांचे कुटुंबिय पाहू शकतात याबद्दल एनआयए गुरुवारी न्यायालयात माहिती सादर करणार आहे. मागील महिन्यात सुधा भारद्वाज यांच्या यांच्या जामीनाच्या याचिकेलाही एनआयएने विरोध केला होता. एल्गार परिषदेची केस महाराष्ट्र सरकारकडून काढून घेत एनआयएकडे सोपवण्यात आली होती.