भोपाळ - भाजप अध्यक्ष अमित शाह हे हत्या प्रकरणातील आरोपी आहेत आणि त्यांचे पुत्र जय शाह जादुगार आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी मारला. ते मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका सभेला संबोधित करत होते. दरम्यान त्यांनी भाजपला फैलावर घेतले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता देश चौथ्या टप्प्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी हे मध्यप्रदेशात प्रचार करत होते. दरम्यान त्यांनी भाजपवर घणाघात केला. अमित शाह हे खुन प्रकरणातील आरोपी आहेत, असा टोला त्यांनी यावेळी मारला. तर, त्यांचा पुत्र जादुगार आहे केवळ तीनच महिन्यात त्याने ८० कोटी रुपयांचे ५० हजार कोटी रुपयात रुपांतर केले, असा आरोपही लावला.
राहुल गांधी यांनी यावेळी 'चौकीदार चोर है' या घोषणाही दिल्या. या प्रकरणावरून आधीच त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या अवमाननेचा खटला सुरू आहे. तर, मोदी आपल्याला भीतात आणि आपल्याशी केवळ २० मिनीटे त्यांनी वादविवाद करावे. ते स्वतःचा चेहराही दाखवणार नाही, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
मोदी यांनी राफेल खरेदी प्रकरणात अनिल अंबानींना फायदा पोहोचवल्याचा पुनरोच्चार केला. पूर्वी पंतप्रधान जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याची हमी देत होते. मात्र ते पैसे त्यांनी अनिल अंबानीला दिले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पण, आमची सरकार सत्तेत आल्यास गरीबांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे घालणार आहे. त्याबद्दल काही शंका असल्यास आम्ही मध्यप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यावर नजर टाकून पहावे, असेही गांधी यावेळी म्हणाले.