चंदीगड - पंजाबमध्ये दुर्घटनेमध्ये विषारी दारू सेवन केल्यामुळे आतापर्यंत अमृतसर, बटाला आणि तरणतारण येथील 98 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील जिवंत राहिलेल्यांपैकी अनेकांनी दृष्टी कमजोर झाल्याचे आणि अस्वस्थपणा जाणवत असल्याचे सांगितले आहे. मृतांमध्ये तरणतारण येथील 75, अमृतसरमधील 12 आणि गुरुदासपूर मधील बटाला येथील 11जणांचा समावेश आहे.
विषारी दारू प्यायलेल्यांपैकी जे लोक जिवंत आहेत, त्यांच्यापैकी अनेकांनी दृष्टी कमजोर झाल्याची आणि अशक्तपणा जाणवत असल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत त्रिवेणी चौहान आणि दर्शन राणी उर्फ फौजन यांना बटाला येथील हाथी गेट येथून अटक केली आहे. येथे बेकायदेशीर दारूचा धंदा अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू असून यावरती अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे बटाला येथील अनेक रहिवाशांनी सांगितले आहे.
या भागात पोलिसांनी छापे टाकून येथील रसायने जप्त केली आहेत आणि ती तपासणीसाठी पाठवली आहेत. प्राथमिक पाहणीत येथील दारूमध्ये स्पिरीट मिसळले असल्याचे समोर आले आहे. स्पिरीटचा उपयोग बहुतेक करून रंग आणि हार्डवेअर उद्योगात केला जातो.
दरम्यान, अमृतसर येथे मृतांच्या कुटुंबियांपैकी बहुतेकांनी बेकायदेशीर दारू धंद्याला वेळेवर आळा न घातल्याने इतक्या लोकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे.