शिमला - कोरोना महामारीमुळे अनेकांना घरातून काम करावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि आभासी माध्यमातून शिकावे लागत आहे. बहुतांश शिक्षण संस्थांनी ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. तरीही देशातील अनेक खेड्यांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील मुलांना स्मार्ट वर्गाच्या सुविधा मिळत नाहीत. ऑनलाईन वर्ग सुरू राहण्यासाठी वेगवान इंटरनेटची गरज आहे. मात्र किनौर येथील अनेक भागात साधे २जी इंटरनेट मिळणे कठीण आहे. त्यामुळे शेकडो मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण स्वप्नवतच ठरले आहे.
कुनो चरंग येथील रहिवासी असलेला विवेक म्हणाला, की आमच्या खेड्यामध्ये इंटरनेटची नीटशी व्यवस्था नाही. त्यामुळे आम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये अडचणी येत आहेत. काल्पातील हरलीन ही विद्यार्थिनी म्हणाली, की गेल्या महिन्यापासून आम्ही ऑनलाईन शिक्षणाकडे वळलो आहोत. मात्र, खराब इंटरनेट कनेक्शनमुळे आम्हाला अडथळे येत आहे. वेळेवर आम्हाला लिंक सुरू करता येत नाहीत.
किनौर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी हिमाचल प्रदेशाच्या इतर भागात शिकत होते. कोरोना महामारीमुळे टाळेबंदी लागू केल्यानंतर ते आपल्या घरी परतले आहेत. मात्र, इंटरनेट नसल्याने हे विद्यार्थी ऑनलाईन शिकू शकत नाहीत त्यामुळे पालकांचीही डोकेदुखी वाढली आहे. पालक शांत नेगी म्हणाले, की किनौर जिल्ह्यातील बहुतांश भागात वेगवान इंटरनेट नाही. व्हिडिओ कॉल करण्यासाठी ३जी व ४जी इंटरनेट नाही.
जवळपास ६० वर्षे उलटली तरी गावांना नाही दूरसंचार सेवा
स्थानिकांच्या माहितीनुसार कुनो चंरग, रोपा खोरे, हँगो चुलिंग, छिटकुल आणि सीमेच्या अनेक भागात इंटरनेटची समस्या आहे. इंटरनेटच नव्हे तर फोन करणेही नागरिकांना कठीण जाते. सरपंच पुर्ण सिंह नेगी म्हणाले, की कुन्नु चरंग येथे दूरसंचाराच्या योग्य सुविधा नाहीत. जवळपास ६० वर्षे उलटली तरी गावांना दूरसंचार सेवा नाही. असे असेल तर मुलांना ऑनलाईन शिक्षण कसे मिळणार आहे? हे शक्य नाही. इंटरनेटचा वेग कमी असल्याने मुले ही लॅपटॉप आणि मोबाईलवर अधिक वेळ वाया घालवितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांच्या खर्चातही वाढ होत आहे. टाळेबंदीने मंदीची स्थिती असल्याने सर्वच पालकांना लॅपटॉप आणि मोबाईल मुलांसाठी खरेदी करता येत नाही.
ऑनलाईन व्यवस्था नसल्याने मुलांच्या शिक्षणावर परिणाम
गरीब कुटुंबातून येणारी मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षणावर परिणाम न होण्यासाठी सरकारने काहीतरी व्यवस्था करणे गरजेचे आहे. पालक तेजस्वी प्रकाश म्हणाले, अनेक कुटुंबाकडे स्मार्टफोन नाहीत. काही गरीब कुटुंबाकडे फोनही नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. जिल्ह्यात इंटरनेटच्या सुविधा चांगल्या द्याव्यात, अशी स्थानिकांची मागणी आहे. सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम घालून विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची गरज असल्याचे स्थानिक सांगतात. या ठिकाणी कोरोनाची भीती व संसर्ग कमी आहे. पालक ठाकूर बिस्त नेगी म्हणाले, की किनौर जिल्ह्यात लोकसंख्या कमी आहे. सरकारने ऑनलाईन शिक्षण बंद करावे, अशी मी सरकारला विनंती करत आहे. सरकारने ऑफलाईन शिक्षणाची विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी.
इंटरनेटची निकृष्ट सेवा असल्याची अधिकाऱ्यांची कबुली
इंटरनेटची निकृष्ट सेवा ही जिल्ह्यातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम करत असल्याचे सरकारी अधिकारीही मान्य करतात. कल्पा येथील उपविभागीय दंडाधिकारी मेजर अविंदर शर्मा म्हणाले, की खेड्यांमधील बहुतांश इंटरनेटच्या योग्य सुविधा उपलब्ध नाहीत. ऑनलाईन क्लाससाठी मुले आणि पालकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बीएसएनएलकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
किनौरचे उपविभागीय आयुक्त गोपालचंद म्हणाले, की काही भागांतील खेड्यांमध्ये कोरोनाचा धोका नाही. जर बाहेरून लोक येणार नसतील तर हा परिसर कोरोनामुक्त राहणार आहे. सरकारने ऑफलाईन क्लास सुरू करावेत, अशी मी सरकारकडे परवानगी मागितली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये डिजीटल इंडिया केवळ शहरी भागापुरतेच मर्यादित राहिले आहे. ग्रामीण भागात फोनची कनेक्टिव्हिटी ही मोठी समस्या आहे. हिमाचल प्रदेशात आदिवासीबहुल जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणात सर्वात अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होण्याकरता सरकारने लवकर प्रयत्न गरजेचे आहे.