नवी दिल्ली - रस्त्याने पायी चालत जाताना किंवा रेल्वे रुळावरून जाताना कुठलेही परप्रांतीय आढळल्यास त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय करावी. तसेच त्यांना बस किंवा श्रमिक विशेष रेल्वेगाडीने त्यांच्या गावी पोहोचिवण्यात यावे, अशा सूचना केंद्राने राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहे.
![food for migrant workers special trains for migrant workers Union Home Secretary Ajay Bhalla Shramik Special trains MHA asks states to provide food to migrants परप्रांतीय मजुरांचा प्रवास परप्रांतिय मजुरांवर लॉकडाऊन परिणाम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7218330_xzc.png)
परप्रांतियांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या. एका दिवसात १०० पेक्षा जास्त श्रमिक विशेष रेल्वे धावतात. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात परप्रांतिय मजूर रस्ता, रेल्वे रुळ आणि ट्रकमधून आपल्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने असे मजूर दिसल्यास त्यांची राहण्यासोबत खाण्यापिण्याची सोय करावी, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले.
केंद्राने परप्रांतिय मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आधीच परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अशा मजुरांची घरवापसी करणे हे त्या त्या राज्याचे काम आहे. मजुरांनी पायी प्रवास करू नये, याची काळजी राज्य सरकारने घ्यायला पाहिजे. गरज असल्यास रेल्वे मंत्रालयाकडून आणखी विशेष रेल्वे सोडण्यात येतील. मात्र, मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याबाबत राज्य सरकारने योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे, असेही भल्ला म्हणाले.