मुजफ्फरपूर - बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात चमकी तापाचा कहर सुरुच आहे. एसकेएमसीएच रुग्णालयात शनिवार उशिरा रात्री एका चिमुकल्याने प्राण सोडले. त्यानंतर या महामारीने मृत्यू झालेल्या मुलांची संख्या १८० वर पोहोचली आहे. तर, शनिवारी आणखी १६ मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
16 नवीन मुले रुग्णालयात भरती -
श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (एसकेएमसीएच) चमकी तापाचे संशयित १२, केजरीवाल रुग्णालयात २ तर, मीनापूरमधील रुग्णालयात देखील २ मुलांना भरती करण्यात आले आहे. एईएसच्या प्रोटोकॉलनुसार या मुलांवर उपचार केले जात आहे. याच पद्धतीने आतापर्यंत ५१९ प्रकरणे समोर आली आहेत.
कामात कसुर केल्याप्रकरणी वरिष्ठ निवासी डॉक्टर निलंबित -
कामात कसुर केल्याप्रकरणी एसकेएमसीएच रुग्णालयाचे वरिष्ठ निवासी डॉक्टर भीमसेन कुमार यांना निलंबित केले आहे. स्वास्थ्य विभागातून 19 जूनला पटना मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातून (पीएमसीएच)चे बालरोग तज्ज्ञ डॉ. भीमसेन कुमार यांची एसकेएमसीएच रुग्णालयात बदली करण्यात आली होती.
पावसानंतर चमकी ताप कमी होईल -
बिहारमध्ये पाऊस पडल्यानंतर चमकी तापाच्या रुग्णांमध्ये घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर चमकी ताप कमी होणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे डॉक्टरांसह नागरिक पावसाची वाट पाहात आहे.
काय आहे चमकी ताप?
अॅक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम अशी या रोगाची व्याख्या केली आहे. त्याचा अर्थ विषाणू, जिवाणू, बुरशी, परोपजीवी, रासायनिक विषे यातून येणारा ताप असा आहे. वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विषाणू तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. टी. जे.जॉन यांच्या मते या संज्ञेला काही अर्थ नाही कारण अशा पद्धतीने कोणताही मेंदूविकार यात बसवता येईल. त्यांच्या मते यात वेगवेगळे रोग येतात. त्यात एन्सेफलायटिस, मेनिंजायटिस, एन्सेफलोपॅथी, सेरेब्रल मलेरिया यांचा समावेश होता पण अधिक अचूक व्याख्येची गरज आहे.