कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली महामारी जलदगतीने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य सेवांवर येत असलेल्या ताणाबद्दल इशारा दिला आहे. जगभरात, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य सेवा पुरविणारे कर्मचारी आणि एकंदरच आरोग्य सेवांसंदर्भातील मागणी तब्बल दहापटीने वाढली आहे.
यामुळे आरोग्य सेवांवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढला असून या अतिताणामुळे आरोग्य सेवांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याआधीचा इतिहास पाहिला असता याआधी आलेल्या महामारीमुळे आरोग्य सेवांवर ताण आल्याने लस तसेच अन्य उपचारांनी प्रकृतीस उतार पडण्याची शक्यता असतानाही मृत्युदरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले होते. जगभरातील आरोग्य सेवांच्या क्षमतेसमोर कोविड-१९ या महामारीने मोठे आव्हान उभे केले आहे.
२०१४-१५ मध्ये इबोला विषाणुमुळे आलेल्या साथीमध्ये आरोग्य सेवांवर ताण आल्याने गोवर, हिवताप, एचआयव्ही-एड्स आणि क्षयरोगांमुळे मृत्यु पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेकडून नोंदविण्यात आले आहे.
"कोणत्याही महामारीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आरोग्य सेवा हाच उत्तम पर्याय आहे,” असे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष तेंद्रोस अधनोम घेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे.
"कोविड-१९मुळे जागतिक आरोग्य व्यवस्था आणि सेवा या किती तकलादु आहेत, हे स्पष्ट होत आहे. यामुळे नागरिकांच्या गरजा सर्वोत्तम पद्धतीने कशा प्रकारे भागविता येतील, यासंदर्भात काही कठीण निर्णय घेणे विविध देशांना भाग पडले आहे,” असे घेब्रेयेसुस यांनी स्पष्ट केले.
या आव्हानांचा सामान करण्यार्थ विविध देशांना मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून काही मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली आहेत. यांमध्ये आवश्यक आरोग्य सेवा पुरवितानाच कोविड-१९वर थेट उपाययोजना करीत व्यवस्था कोलमडण्याचा धोका टाळण्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सुचविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा पुरविताण्याचे सातत्य राखतानाच आवश्यक सेवांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेकडून विविध देशांना करण्यात आले आहे. उदाहरणार्थ नियमित लस, मानवी जन्माशी संबंधित आरोग्य सेवा, नवजात अर्भके व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सेवा, मानसिक आरोग्य व्यवस्थापन यांचबरोबर असंसर्गजन्य आजार व एचआयव्ही, हिवताप आणि क्षयासारख्या संसर्गजन्य आजारांशी संबंधित आरोग्य सेवांचा समावेश आवश्यक आरोग्य सेवांमध्ये करता येईल. याचबरोबर, जागतिक आरोग्य संघटनेकडून देशांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याबरोबरच स्वच्छता पाळणे आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी साधनांची सोय करतानाच पुरेसा इतर साठाही करून ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खबरदारीही दक्षतेने घ्यावयाचे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले आहे.
"आरोग्य सेवा या सुव्यवस्थित व दक्ष असावयास हव्यात. मात्र आणीबाणीच्या काळात आवश्यक सेवा पुरवित आपण थेट मृत्युदर मर्यादित करू शकतो आणि वाढलेला अप्रत्यक्ष मृत्युदर टाळू शक्तो,” असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
व्यवस्थेवर लोकांचा असलेला विश्वास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचणे आवश्यक आहे, याचबरोबर लोकांशी पारदर्शी संवाद आणि प्रभावी सामुदायिक प्रतिबद्धताही आवश्यक असल्याची भूमिका जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे.