नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळेल. तेथे लागू करण्यात आलेला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायमचा राहणार नाही,' असे म्हटले आहे. मात्र, यासाठी योग्य परिस्थिती तेथे निर्माण होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
एका प्रश्नाचे उत्तर देताना शाह यांनी अधिकृतरीत्या जम्मू-काश्मीरविषयी हे विधान केले. 'आर्टिकल ३७० मुळे काश्मीरींचे स्वत्व आणि त्यांचे हित जपण्यात येत होते. तसेच, तेथील संस्कृतीचे रक्षण होत होते, असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्यात आला होता,' असेही शाह म्हणाले. 'आर्टिकल ३७० हटवल्यामुळे काश्मीरची ओळख पुसली जाण्याची सुतराम शक्यता नाही,' असे ते पुढे म्हणाले.
'भारतीय संविधानाने प्रत्येक प्रदेशांची मूळ ओळख जपली आहे. तसेच, त्यांचे संरक्षणही केले आहे. यासाठी वेगळ्या तरतुदीची आवश्यकता नव्हती. मात्र, आर्टिकल ३७० लागू करून काश्मीरी लोकांची आणि संपूर्ण देशाची दिशाभूल करण्यात आली होती. या तरतुदीचा केवळ सीमेपलीकडून भारतात निर्यात होणारा दहशतवाद पोसण्यासाठी वापर झाला,' असे शाह म्हणाले.