नवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. मात्र, जागतिक तेलाच्या किंमती अत्यंत कमी असताना ही वाढ केल्याने काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे. सरकारचा हा निर्णय 'आर्थिकदृष्या देशविरोधी' असून यामुळे लोकांकडून वर्षाकाठी 1.40 कोटी रुपये उकळले जातील, असे म्हटले आहे.
सध्या देशातील 130 कोटी जनता कोरोना महामारी संकटाचा सामना करत असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून हे सरकार जनतेकडून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 14 मार्चलाच पेट्रोल-डिझेलवर सरकारने 3 रुपये उत्पादन शुल्क वाढवले होते. तितक्यात आता पुन्हा इतकी मोठी वाढ करण्यात आली असून त्यातून जनतेच्या खिशातील 1.40 कोटी रुपये जाणार आहेत. जागतिक तेलाच्या किंमती कमी असताना इतके दर वाढवल्याचे उत्तर सरकारमधील कोण देणार का? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
2014-15 ते 2019-20 या सहा वर्षांच्या कालावधीत भाजपाप्रणीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात 12 पट वाढ केली आहे. त्यातून 17 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. हे पैसे कोठे आहेत? कोठे गेले? पंतप्रधान मोदींना पुढे येऊन या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे सुरजेवाला म्हणाले.