हिमाचल प्रदेश : लाहूल-स्पिटी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे चक्क एक रस्ताच वाहून गेल्याने भरपूर लोक अडकून पडले होते, ज्यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. यामधील १५० लोकांना वाचवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील छोटा दरा, छत्रू आणि ग्रंफू भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बॉर्डर रोड टास्क फोर्स (बीआरटीएफ) चे कर्नल उमा शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला होता. ज्याला प्रथमोपचारानंतर जवळच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.
अजूनही जवळपास ४०० पर्यटक केलाँग आणि सिस्सू परिसरांदरम्यान अडकले आहेत. ते सध्या सुरक्षित ठिकाणी आहेत. मात्र, त्यांना पाऊस थांबेपर्यंत तिथून बाहेर पडता येणार नाही, असेही शंकर यांनी सांगितले.
गेल्या २४ तासांमध्ये या मुसळधार पावसामुळे १८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी ट्विट करून मृतांना श्रधांजली वाहिली आहे.