नवी दिल्ली - वन्यजीवांच्या संरक्षणाच्या उद्देशाने रणथंभोर राष्ट्रीय उद्यान आणि मुकुंद्रा हिल टायगर रिझर्वजवळील दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर 'वन्यजीवांसाठी कॉरिडॉर' बनवण्याची योजना आहे, असे राजस्थानचे वन व पर्यावरणमंत्री सुखराम बिश्नोई यांनी सांगितले.
वन्यजीवांसाठी कॉरिडॉर हा वन्यप्राण्यांचे रक्षण करण्यासाठी रणथंभोर नॅशनल पार्क आणि मुकुंद्रा हिल टायगर रिझर्वजवळील भागांतून जाईल. कॉरिडॉरच्या प्रस्तावाला भारतमाला प्रकल्पांतर्गत भारत सरकारने मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक सुलभ करण्यासाठी आतापर्यंत 44 आर्थिक कॉरिडॉर आणि 24 मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क बनवण्याची योजना भारतमाला प्रकल्पांतर्गत आखली गेली आहे. देशभरात रस्त्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी ‘भारतमाला’ हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. महामार्गांच्या जाळ्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उत्पादनांची वाहतूक जलदगतीने होईल. यात वेळ, पैसा आणि इंधन यांचा अपव्यय टळणार आहे.