नवी दिल्ली - येत्या 28 ऑक्टोबरपासून तीन टप्प्यांमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. पुन्हा सत्तेत आलो, तर बिहारच्या जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन भाजपाने जाहीरनाम्यात दिले आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. आता या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले आहे.
भाजपाने जाहीरनाम्यामध्ये केलेला मोफत कोरोना लसीचा उल्लेख योग्यच होता, असे म्हटले आहे. आरोग्य हा विषय राज्याच्या अखत्यारित येतो. त्या-त्या राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे, हे तेथील राज्य सरकारची जबाबदारी असते. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास जनतेला मोफत लस देऊ, असे आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कोणताही पक्ष त्यांना हवे असलेल्या मुद्द्यांचा जाहीरनाम्यात उल्लेख करू शकतो, असेही त्या म्हणाल्यात.