चेन्नई - वंदे भारत मोहीमेचा भाग असलेले एक विमान आज तामिळनाडूमध्ये दाखल झाले. कोईंबतूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या या विमानातून दुबईमध्ये अडकलेल्या १८० भारतीयांना मायदेशी आणण्यात आले.
एअर इंडिया एक्सप्रेस (आयएक्स १६११) या फ्लाईटमधून हे नागरिक देशात परतले. यांमध्ये ९४ पुरूष, ६६ स्त्रिया, १७ लहान मुले आणि तीन बाळांचा समावेश होता. यांमधील बहुतांश लोक हे तामिळनाडूचे होते, तर काही कर्नाटक आणि पद्दुचेरीचे होते अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विमानतळावर वैद्यकीय पथकाने या लोकांचे स्वॅब नमुने गोळा केले. या सर्वांना एका आठवड्यासाठी संस्थात्मक विलगीकरणात पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना सात दिवसांसाठी गृह-विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रवाशांच्या संस्थात्मक विलगीकरणाचा खर्च हा त्या-त्या प्रवाशांनीच उचलायचा आहे. तसेच, यावेळी ज्या लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येतील, अशा लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
हेही वाचा : मुंबईत खराब हवामानामुळे विमान धावपट्टीवरून घसरले, विमान सेवा तात्पुरती ठप्प