नवी दिल्ली - मागील काही वर्षात देशातून विजय मल्या, निरव मोदी आणि मेहूल चोक्सीच नाही तर त्यांच्यासारखे तब्बल ३६ कर्जबुडवे देशातून फरार झाले, असा धक्कादायक खुलासा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. आगस्टा वेस्टलँड प्रकरणातील सुशेन मोहन गुप्ता या आरोपीच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ही माहिती देण्यात आली.
आगस्टा वेस्टलँड खरेदी प्रकरणातील मध्यस्थ सुशेन गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. दरम्यान सुशेन गुप्ता यांना जामीन मिळाल्यास मागच्या काही वर्षात फरार झालेल्या इतर ३६ आरोपींसारखे तेही पळून जातील, असा युक्तीवाद ईडीने न्यायालयासमोर मांडला.
निरव मोदी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांच्यासारखेच गुप्ता यांचे आताही तुरुंगाबाहेर मोठे संबंध आहेत. त्यांच्या मदतीने इतर आरोपींसारखे ते ही फरार होऊ शकतात. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असे ईडीच्या वतीने डी. पी. सिंह आणि एन. के. मित्ता यांनी सांगितले.
ईडीने केलेल्या खुलाशामुळे आता देशभरात खळबळ उडालेली आहे. हे ३६ आरोपी कोण याबद्दल अद्याप पडदा उठलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात देशाला चुना लावून हे आरोपी पळाले आहेत, असे समजते. या सुनावणी दरम्यान ईडीच्या वकिल सम्वेदा वर्मा यांनी सुशेन यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी साक्षदारांना प्रभावित केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा तो आरोप आहे. न्यायालयाने सध्या २० एप्रिल पर्यंत जामीन याचिका राखून ठेवली आहे.