रांची - झारखंडमधील दुमका जिल्ह्याच्या मसानजोर ठाण्याच्या हद्दीतील बागनल गावात नक्षलवादी आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी) यांच्यात चकमक झाली. या चकमकीत एसएसबीच्या ५ जवानांवर गोळीबार करण्यात आला. या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी सांगितले, की रानीश्वर-शिकारीपाडा ठाण्याच्या हद्दीतील जंगल क्षेत्रात कठहलियाजवळ ही चकमक झाली. याठिकाणी १२ ते १५ नक्षलवादी ३-४ दिवसापासून जमले असून ते हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस आणि सशस्त्र सीमा दलाने रविवारी सकाळी या भागात शोधमोहिम सुरु केली. यादरम्यान नक्षलवाद आणि सीमा दलात चकमक सुरू झाली. यावेळी दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आले.
या चकमकीत ५ नक्षलवाद्यांना गोळी लागली असून याठिकाणी सध्या शोध मोहिम सुरू आहे. तसेच या घटनेत आमच्या ५ जवानांना गोळी लागली आहे. त्यात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. नीरज छेत्री असे मृत जवानाचे नाव आहे. तर इतर ४ जवान जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.