हैदराबाद - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतावर येणारे संकट काही थांबवण्याचे नाव घेत नाहीत. तौक्ते वादळाने गुजरात, महाराष्ट्र, केरळचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तौत्के' चक्रीवादळ शांत होतंय न होतंय तोच आणखी एका वादळाचा इशारा देण्यात आला आहे. भारताच्या पूर्व भागाला 'यास' नावाचे वादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळ 'अम्फान'पेक्षाही जास्त भयंकर असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
'यास' हे वादळाचे नाव असून हे नाव ओमानने ठेवले आहे. 'यास' या शब्दाचा अर्थ म्हणजे निराशा होय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. जे हळूहळू चक्रीय वादळाचे रूप घेईल. बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी अंदमान आणि निकोबार बेटांच्या उत्तरेस तयार होणाऱ्या या कमी दाबाच्या क्षेत्रावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 22 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या 72 तासात चक्रीवादळात बदलू शकते. यावेळी, पूर्व किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच समुद्राच्या लाटा रुद्र रुप घेताना दिसू शकतात. 26 मे रोजी हे चक्रीवादळ वादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. यास वादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल. या राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
किनारपट्टीच्या भागासाठी इशारा -
वादळाचा ठोका पाहता हवामान खात्याने ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टी भागांना इशारा दिला आहे. किनारपट्टी भागात राहणार्या लोकांना, विशेषत: मच्छिमारांना या काळात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. सध्या समुद्रावर गेलेल्या मच्छिमारांना 23 मे पर्यंत परतण्यास सांगण्यात आले आहे.
ताशी 50 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार -
22 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 72 तासांत जेव्हा त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतरित होईल तेव्हा जोरदार वारे वाहतील. यावेळी, ताशी 50 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणे अपेक्षित आहे. हवामान खात्याचा अंदाज बरोबर असेल तर 50 ते 55 कि.मी. वेगाने वारे वाहू लागल्याने जोरदार पाऊस कोसळू शकतो.
'यास' चक्रीवादळ 'अम्फान'पेक्षाही भयंकर -
तौक्ते वादळाचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील विध्वंसची छायाचित्रे सर्वांनी पाहिली आहेत. तौक्तेमुळे जीवित व मालमत्तेचे दोन्ही नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यास वादळाची तीव्रता मागील वर्षी आलेल्या 'अम्फान' प्रमाणेच असू शकते. गेल्या वर्षी जून महिन्यात अम्फान चक्रीवादळ आले होते. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसला होता.