करावरा (कर्नाटक): उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळमध्ये ढगफुटीमुळे अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग जलमय होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे एका घरावर डोंगर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांना जीव गमवावा लागला आहे. ( A hill collapsed on a house in Bhatkal ) ( Four people of the same family died )
तालुक्यातील मुतल्ली गावात ही दुर्घटना घडली. भटकळमध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून, आज सकाळी मुतल्ली गावातील घरावर डोंगर कोसळला. यामध्ये लक्ष्मी नायक (48), मुलगी लक्ष्मी (33), मुलगा अनंथा नारायण नायका (32) आणि नातेवाईक प्रवीण (20) यांचा मृत्यू झाला. पहाटे ४ वाजता ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, बचावकार्यात विलंब होत आहे. सकाळी 8 वाजता बचावकार्य सुरू झाले आणि दुपारी 1 वाजेपर्यंत ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दुसरीकडे पुरामुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील मुत्तल्ली, मुंडल्ली, चौथिनी, शिराली, समशुद्दीन सर्कल आणि भटकळच्या अर्ध्याहून अधिक भागांना पुराचा फटका बसला आहे. चौथिनी आणि व्यंकटापुरा नद्या ओसंडून वाहत असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लोक अडकले आणि धोक्यात आले. ही बाब तालुका प्रशासन आणि एनडीआरएफच्या टीमला समजताच त्यांनी संकटात सापडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम केले. बोटीच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम बचाव दलाच्या जवानांनी केले.
रात्री बारा वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला आणि तीन वाजेपासून भटकळमधील पाण्याची पातळी वाढू लागली. रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने पाण्यात वाहून गेली, तर घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.