इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली; 'जीबीएस' सिंड्रोम संसर्ग होण्याच्या भीतीनं स्थानिक नागरिक भीतीच्या सावटात - INDRAYANI RIVER POLLUTION
Published : Feb 2, 2025, 9:12 AM IST
आळंदी (पुणे) : राज्यातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र अशी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषित पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. इंद्रायणी नदी काठी असणाऱ्या काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडलं जातं. त्यामुळे वारंवार इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येते. त्यामुळं नदीपात्रातील जलचर जीवन आणि इंद्रायणी नदीमध्ये आचमन करणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्यदेखील धोक्यात आलंय. मात्र, असं असूनही पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्यावर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कारवाही करत नसल्यानं आळंदीचे ग्रामस्थ आणि वारकरी संताप व्यक्त करत आहेत. तसंच सध्या पुण्यातील वेगवेगळ्या भागात GBS सिंड्रोमचे संशयित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळं नदीच्या फेसाळलेल्या पाण्यामुळं हा संसर्ग होण्याच्या भीतीनं स्थानिक नागरिक भीतीच्या सावटात असल्याचं बघायला मिळतंय.