कोल्हापूर-बीड सरपंच हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मुख्य संशयित वाल्मिक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांच्या अडचणी वाढत असताना आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारवर तोफ डागलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात कराडसह त्यांच्या सहकाऱ्यांना संरक्षण देत आहेत का, असं म्हणत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा गोडवा कशासाठी, असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केलाय, ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
आरोपींवर 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करावा : मी अजून सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं नाही. मात्र माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून या हत्या प्रकरणाचं कनेक्शन बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे म्हणूनच आमची सरकारकडे मागणी आहे की, आरोपींवर मकोकाच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल केलाय, त्याऐवजी 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात यावा, याशिवाय पर्याय नसल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलंय. तसेच धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळात मंत्री राहणंदेखील बरोबर नाही, या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा :मंत्री धनंजय मुंडे फार मोठमोठं बोलतात, मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा. वाल्मिक कराडनं आपलं वटमुखत्यारपत्र धनंजय मुंडेंना दिलंय, यापेक्षा आणखी काय हवं? राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे, तरीदेखील तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायचा आहे का? असा सवाल उपस्थित करत माझा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की, जर मुंडे स्वच्छ प्रतिमेचे आहेत ना मग त्यांना पालकमंत्रीची जबाबदारी का देण्यात आली नाही, मात्र ते दोषी आहेत म्हणूनच त्यांना पालकमंत्रिपद दिलेलं नाही. हत्या होऊन दीड महिना उलटला तरीही अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत वाल्मिक कराडला प्रोटेक्शन देत आहेत, तुम्ही अजूनही वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद करीत नाहीत. सरकारने लवकरात लवकर पारदर्शीपणे खुनाचा गुन्हा दाखल करून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केलीय.