मुंबई-संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राकडे प्रगतिशील आणि पुरोगामी राज्य म्हणून पाहिले जाते. पण त्याच पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला आव्हान देणारे राजकारण महाराष्ट्रात मागील तीन-चार दिवसांपासून घडत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताना टोपलीभर लिंबू सापडले होते, असा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केल्यानंतर काळी जादू, लिंबू, रेड्याची शिंगे आणि बरंच काही या राजकारणाला सुरुवात झालीय. रामदास कदम यांच्या आरोपावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रेड्यांची शिंगे पुरल्याचा विधी केला होता. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीत का? अशी शंका उपस्थित केलीय. दरम्यान, महाराष्ट्रात कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर काही वर्षांपूर्वी जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर केले होते. मात्र, राजकीय नेते अंधश्रद्धेचा संदर्भ देत राजकारण करत असल्यामुळं काळी जादू आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालताहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत सत्ताधारी-विरोधकांत नेमका कोणता कलगीतुरा रंगला आहे आणि एकमेकांवर काय आरोप करताहेत, ते पाहू यात...
त्यानंतर मी राहायला जाणार :दरम्यान, वर्षा बंगल्यातील लिंबू, काळी जादू, रेड्याचे शिंग यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. वर्षा बंगल्यामध्ये एकनाथ शिंदेंनी काळी जादू केलीय. गुवाहाटीला जाऊन कामाख्या मंदिरात जे रेडे कापले त्यांची मंतरलेली शिंगे वर्षा बंगल्यात पुरली आहेत, असं त्यांचीच माणसं सांगताहेत, इथे कोण मुख्यमंत्री टिकू नये, म्हणून शिंदेंनी काळी जादू केलीय. पुरोगामी महाराष्ट्रात आमचा अंधश्रद्धेवरती विश्वास नाही. पण त्यांचेच लोक हे सांगत आहेत. म्हणून वर्षावर देवेंद्र फडणवीस जायला घाबरत आहेत का? सागर बंगल्यापासून वर्षा बंगला पाच पावलांच्या अंतरावर आहे. तरी पण फडणवीस का राहायला जात नाहीत? असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "माझ्या मुलीची दहावीची परीक्षा आहे आणि ती म्हणाली की सध्या अभ्यासासाठी आपण येथेच राहू, परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाऊ. त्यामुळे मुलीची परीक्षा झाल्यानंतर आम्ही वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. पण अशा अंधश्रद्धेवरील प्रश्नांना मी उत्तर देणे योग्य समजत नाही, असं 'लोकसत्ता' या वर्तमान पत्राच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेवर पलटवार केलाय.
जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा :आपल्या महाराष्ट्र राज्याने देशाला पथदर्शी होईल, असा जादूटोणा विरोधी कायदा केलाय. त्या राज्यात कोणीतरी काळी जादू करते, या विषयी सध्या चर्चा केंद्रस्थानी येणे ही बाब अत्यंत खेदजनक आहे. आपला समाज सुधारणेचा वारसा हा महाराष्ट्र विसरला आहे का? असा प्रश्न पडतो. काळी जादू अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. कोणी अशी शक्ती असल्याचा दावा करत असेल तर, तो जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे, असं अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य, राहुल थोरात यांनी वर्षावरील जादूटोणा, काळीजादू आणि लिंबू यावर प्रतिक्रिया दिलीय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 महिन्यांनंतरही वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. ते का गेले नाहीत याबाबत त्यांनी आता खुलासा केलाय. मात्र जादूटोणा विरोधी विधेयक महाराष्ट्रात मंजूर झाले असताना पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेबाबत बोलणे हे अत्यंत चुकीचे आहे. संजय राऊतांना सत्ताधाऱ्यांबद्दल सतत संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे. ही त्यांची रणनीती असू शकते, चर्चेत राहण्यासाठी ते वक्तव्य करत असतील. पण दुसरीकडे राऊतांची जर ही स्ट्रॅटेजी असली तरी एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीला फेडले. हासुद्धा एक अंधश्रद्धेचाच भाग आहे. म्हणून कुठेतरी संशयाचे वातावरण निर्माण होते. पण शेवटी हे सगळे नॉन इशू विषय आहेत. याच्यापेक्षा राज्यात अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्याच्यावरती खरंतर चर्चा होणे गरजेचे आहे. परंतु या विषयांना फारसे महत्त्व किंवा फारसे गंभीर घेण्याची आवश्यकता नाही, असं मला वाटते, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय.