महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साप्ताहिक 'मार्मिक'चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे निधन, आज दुपारी होणार अंतिम संस्कार - PANDHARINATH SAWANT PASSES AWAY

साप्ताहिक 'मार्मिक'चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Pandharinath Sawant passes away
पंढरीनाथ सावंत यांचे निधन (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2025, 10:24 AM IST

Updated : Feb 8, 2025, 2:47 PM IST

मुंबई -बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून मुंबईतील मराठी माणसाच्या भावनांना आणि मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडली. ही व्यंगचित्रं प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक 'मार्मिक'चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचं निधन झालं.

मराठीतील पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक ठरलेल्या 'मार्मिक'चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षाचे होते. आज दुपारी अंत्ययात्रा निघणार आहे. भोईवाडा येथील स्मशानभूमीत पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'मार्मिक' साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत हे लालबाग येथील दिग्विजय मिल परिसरातील पत्रा चाळ येथे वास्तव्याला होते. येथेच त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. परखड, थेट आणि रोखठोक आपली मते मांडणारा पत्रकार अशी पंढरीनाथ सावंत यांची अनेक वर्ष महाराष्ट्राला ओळख आहे.

'या' पुरस्कारांनी झाला होता गौरव-पंढरीनाथ सावंत यांच्या पत्रकारितेची दखल अनेकांनी घेतली. त्यांना विविध पुरस्कारानंदेखील गौरवण्यात आलं. मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कारा'नं सावंत यांना गौरवण्यात आलं होतं. सोबतच, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'कृ. पा. सामक जीवनगौरव पुरस्कारा'नंदेखील पंढरीनाथ सावंत यांना गौरवण्यात आलं.

मुंबईवर पुस्तक लिहिण्यास केली होती सुरुवात-पंढरीनाथ सावंत यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम केलं होतं. प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब या ठाकरे पिता-पुत्राचे ते विश्वासू सहकारी होते. गिरणगावाची त्यांना विशेष ओढ होती. त्यांनी जीवनातील अनुभवावर 'मी पंढरी गिरणगावचा' हे आत्मचरित्र लिहिलं. त्यामध्ये लालबाग आणि परळ येथे राहणाऱ्या कापड गिरणी कामगारांच्या जीवनाविषयी प्रकाश टाकला. सुरुवातीच्या काळात त्यांनी बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून काम केले. त्यानंतर पत्रकार म्हणून काम केलं. 'मार्मिक' मध्ये त्यांनी कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी कुशलतेने निभावली. त्यांनी अनेक पत्रकार घडवले. अलीकडच्या काळात त्यांनी मुंबईबाबत पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र (Source- ETV Bharat)

आत्मचरित्र हा ऐतिहासिक दस्तऐवज-बाळासाहेब ठाकरे यांनी पंढरीनाथ सावंत यांच्या आत्मचरित्राबाबत 13 ऑगस्ट 2000 रोजी पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी 'मी पंढरी गिरणगावचा' या आत्मचरित्राविषयी कौतुक केलं होतं. त्यांनी पत्रात म्हटलं होतं, 'पंढरी हे पत्रकार-लेखक म्हणून आमच्या घरचं 'प्रॉडक्ट' आहे. मुंबईतील कारखान्यात हेल्पर, गणपतीच्या कारखान्यात रंगारी, बेस्ट बसमध्ये कंडक्टर, अंगावर खाकी कपडे घालून चित्रकलेचे शिक्षण आणि म्युनिसिपालिटीच्या उर्दू शाळेत चित्रकला शिक्षण आणि शेवटी पत्रकार असा त्यांचा प्रवास राहिला. हा आत्मचरित्रासाठी चांगला मसाला आहे. त्यांनी जगाचा साक्षीदार म्हणून चरित्र लिहिलं असल्यानं हा इतिहास झाला. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अर्ध्याहून अधिक भाग हा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो.'

पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने एका ध्येयनिष्ठ पत्रकार, लेखक हरपल्याची भावना समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Last Updated : Feb 8, 2025, 2:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details