पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातून राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला जनधन अकाऊंट देत होते तेव्हा, राहुल गांधी म्हणत होते की, पंतप्रधान मोदी अकाउंट तर देत आहेत. मात्र, त्या अकाऊंटमध्ये काय देणार? पण आता राहुल बाबा मोदींजीचा चमत्कार बघा, १० लाख लोकांना एका क्लिकवर घराचा पहिला हप्ता त्याच अकाऊंटवर मिळाला आहे," असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
१० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा : पुण्यातील बालेवाडी स्टेडियम इथं शनिवारी 'प्रधानमंत्री आवास योजने'च्या लाभार्थ्यांच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना योजनेचा प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या एका क्लिकवर १ हजार ५०० कोटी हे १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असून एका लाभार्थ्याला १५ हजार रुपये देण्यात आले. या योजने अंतर्गत एकूण ३३ हजार लाभार्थी आहेत. त्यात पुण्यातील १९ हजार हे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
CM, DCM यांचं केलं अभिनंदन : राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं अमित शाह यांनी अभिनंदन केलं. "देशात पहिल्यांदा असा प्रसंग घडला आहे की, एका वेळी २० लाख लाभार्थ्यांना योजनेचा लाभ होत आहे. आपण पाहिलं तर, अनेकदा सरकार आश्वासन देतं ते पूर्ण व्हायला वेळ लागतो. परंतु, मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमनं आज आश्वासन पूर्ण केलं आहे. आम्हाला विकसित भारत करायचा आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी घरे देण्याचा संकल्प केला. त्यांनी सर्वात जास्त घरे ही महाराष्ट्रला दिली आहेत. तसंच घरासोबत शौचालय, लाईट, सिलिंडर आणि धान्य देण्याचं काम केलं आहे. देशात आणि राज्यात अनेक विकास कामं सुरू आहेत. रेल्वे स्टेशन देखील नवीन होत आहेत. तसंच नागपूर आणि पुण्यात मेट्रोचं काम होत आहे," असं म्हणत शाह यांनी विकासकामांचा पाढाच वाचला.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर शाह यांची टीका : "मी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानतो की त्यांनी महायुती सरकारला परत निवडून दिलं पण, महाराष्ट्रातील जनतेनं कोणती शिवसेना खरी आहे आणि कोणती शिवसेना खोटी आहे यासोबत कोणती राष्ट्रवादी खरी आणि कोणती राष्ट्रवादी खोटी हे पण जनतेनं दाखवून दिलं," अस म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.