मुंबई Stampede Like Situation In Mumbai : एअर इंडियाच्या 'एअरपोर्ट लोडर'च्या भरतीदरम्यान एअर इंडियाच्या कलिना कार्यालयाबाहेर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. 2,200 पदांसाठी 25 हजारहून अधिक अर्जदार आले. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडनं एअरपोर्ट लोडर या पदासाठी भरती काढली. मंगळवारी 16 जुलैला या पदासाठी मुलाखती ठेवण्यात आल्या. कलिना इथल्या कार्यालयात या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. मात्र, 2,216 जागांसाठी असलेल्या भरतीला तब्बल 25 हजारहून अधिक उमेदवार आल्यानं एअर इंडिया व्यवस्थापनाला मोठा संघर्ष करावा लागला. एकाच वेळी 25 हजार उमेदवार या परिसरात दाखल झाल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
एअरपोर्ट लोडर्सना दिलं जाते हे काम :एअरपोर्ट लोडर्सना विमान लोडिंग, अनलोडिंग, बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवण्याचं काम दिलं जाते. प्रत्येक विमानाला सामान, माल आणि अन्न पुरवठा हाताळण्यासाठी किमान पाच लोडरची आवश्यकता असते. एअरपोर्ट लोडरचा पगार दरमहा 20,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असतो. पण, बहुतांश कर्मचारी ओव्हरटाईम भत्त्यानंतर 30,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात. नोकरीसाठी शैक्षणिक निकष मूलभूत असले तरी, या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे.
लोडर स्टाफच्या 2,216 जागांसाठी मुलाखती :एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस लिमिटेड कंपनीने लोडर स्टाफच्या 2,216 जागांसाठी मुलाखती आयोजित केल्या होत्या. या 2 हजार पदांच्या भरतीसाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अर्जदार आले. ही गर्दी इतकी वाढली की एकाच वेळी 25,000 अर्जदार जमा झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून एअर इंडिया व्यवस्थापनानं अर्जदारांना त्यांचा बायोडेटा जमा करून 'आम्ही तुम्हाला संपर्क साधू' असं सांगत परत जाण्यास सांगितलं.
खासदार वर्षा गायकवाड यांनी शेयर केला व्हिडिओ :खासदार वर्षा गायकवाड यांनी विमानतळाबाहेर नोकरी शोधणाऱ्यांच्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओ शेअर केला. खासदार वर्षा गायकवाड यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "जन हो, हे आहे आपल्या देशातील कटू सत्य, वाढत्या बेरोजगारीचा आगडोंब आहे. ज्यावर हे खोटारडं सरकार कायमच मोठमोठ्या जुमल्यांचं पांघरून घालत आले आहेत. 56 इंचाची छाती फुगवून मोठ्या अभिमानानं देशाच्या प्रगतीच्या बाता ठोकणारे हे सरकार, आमच्या एका प्रश्नाचं उत्तर देईल का? देशाचं भवितव्य हे युवा वर्गाच्या हातात आहे, असं आपण जाणतेपणानं दरवेळी म्हणतो. मग या तरुणाईच्या हातात रोजगारच नसतील, तर ते स्वतः घडणार कसे? आणि देशाला घडवणार कसे? निवडक जागांच्या भरतीसाठी हजारो तरुण कंपन्यांच्या बाहेर अक्षरशः शेळी-मेंढ्यांसारखी गर्दी करतानाचं हे चित्र देशाच्या अधोगतीची साक्ष देतात."
हेही वाचा :
- हाथरस सत्संग चेंगराचेंगरी : भोलेबाबाचा सेवक देव प्रकाश मधुकर याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, बाबाचा शोध सुरूच - Hathras Stampede
- हाथरस सत्संग चेंगराचेंगरी : भोलेबाबाचा सेवक देव प्रकाश मधुकर याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, बाबाचा शोध सुरूच - Hathras Stampede