कोल्हापूर : "आज शिवाजी महाराजांची 395 वी जयंती, पाच वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला 400 वर्षे पूर्ण होतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य निश्चितच देशातील सर्वांना मार्गदर्शक ठरलं आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गानं आपण पुढे जाऊ यातून देश पुढं जाईल आग्र्यामध्ये शिवजयंती साजरा होत आहे याचा आनंद आहे. आग्रामधून छत्रपती शिवाजी महाराज निसटले. महाराजांच्या गनिमी काव्याचं हे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रावरून परत कसे आले? हे कोणालाच माहीत नाही. या संदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. मध्यंतरी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी चुकीचं वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून निसटले हे निश्चित आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या माणसांना पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची आहे." असं खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, सरकारची कारवाई योग्य : "विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही. विकिपीडियामध्ये ज्याला जे वाटते ते तो टाकतो. पण, ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली त्यांचा निषेध केला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विकिपीडियावर असलेला मजकूर बदनामीकारक असल्याने तो काढून टाकायला हवा. महाराष्ट्र सरकारनं त्यासंदर्भात केलेली कारवाई योग्य आहे." असं खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.