महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधान मोदी जिथं हात लावतात तिथं माती होते; संजय राऊतांचा हल्लाबोल म्हणाले 'महाराजांचा पुतळा पाहून काळजात चर्रर झालं' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 12:31 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची हानी झाली. या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं हात लावतात, तिथं माती हते, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महायुती सरकारनं 8 महिन्यापूर्वी बसवला होता. पण हा पुतळा सोमवारी कोसळला. यावर विरोधकांनी टीका केली असून, शिवप्रेमीमधून संतापाची लाट उसळत आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं... चालवलं जातं... परंतु ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हानी झाली, ते पाहून आमच्या हृदयावरती घाव पडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुका आणि मतं डोळ्यासमोर ठेवून घाईघाईनं महाराजांच्या पुतळ्याचं थाटामाटात उद्घाटन केलं. त्यावेळी सरकारला पुतळ्याचं अनावरण करू नका, असं सांगण्यात आलं. पण त्यांनी घाईघाईनं उद्घाटन केलं. त्यावेळी पुतळ्याच्या अनावरासाठी काही इतिहासकारांनी आक्षेप नोंदवला. स्वतः संभाजीराजे यांनीही पुतळ्याच्या अनावरणाला विरोध केला. शेवटी तो पुतळा पडला, हा आघात भरून न येण्यासारख्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथं हात लावतात, तिथं माती होते, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत (Reporter)

पंतप्रधान मोदी हात लावतील तिथं माती होते : "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं हात लावतील तिथं माती होते. एक म्हण आहे "हात लावील तिथं सोनं". परंतु पंतप्रधान मोदींच्या बाबतीत असं नाही. पंतप्रधान मोदी जिथं हात लावतील तिथं चांगलं काही होत नाही. त्यांनी अयोध्या मंदिरांचं लोकार्पण केलं. तिथं गाभाऱ्यात पाण्याची गळती सुरू आहे. संसद भवनाचीही तीच अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. काल तो पुतळा कोसळला. त्यामुळे देशातील असे पहिले पंतप्रधान आहेत की, जिथं जिथं त्यांनी हात लावला, त्याची माती झाली आहे," अशी खोचक टीका संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

मोगलांनी असा अपमान कधी केला नाही :छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही मोगलांनी त्यांचा कधी असा अपमान केला नव्हता. त्यांच्यावर अशी वेळ कधी आली नव्हती. आग्र्यातून महाराज स्वाभिमानानं तिथून आलं. पण त्यांच्यावर अशी कोसळण्याची आणि अपमानित होण्याची कधी वेळ आली नव्हती. परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या सरकारनं त्यांच्यावर कोसळण्याची वेळ आणली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. पुतळ्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं आहे. पुतळ्याचं काम एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदाराला दिलं. पुतळ्याचं बांधकाम, शिल्पकार आणि कंत्राटदार हे ठाण्यातील असल्याचं समजते. त्या ठेकेदारांनी शिंदेंना किती कमिशन दिलं? याचाही त्यांना हिशोब द्यावा लागेल, असा हल्लाबोल संजय राऊतांनी सरकारवर केला.

महाराष्ट्राच्या भावनेशी खेळताय, राजीनामा द्या :"सरकार आता कारणं काही सांगू दे, पण महाराष्ट्र दुःखी आहे. महाराष्ट्राच्या छातीत आरपार ही वेदना झाली आहे. त्याची भरपाई कधीच भरुन निघणार नाही. महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे झाल्याचं पाहिलं. महाराष्ट्रावर अशी वेळ कधी येईल, असं वाटलं नव्हतं. पण सरकार अजूनही हसत आहे. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना दिसत नाही. सरकार म्हणतेय की, समुद्र काठावर जोराचा वारा असल्यामुळं पुतळा कोसळला. तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय. 1933 रोजी गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आलाय. अजूनही तो पुतळा जशाच्या तसा उभा आहे. इथंही समुद्रच आहे... हवा आहे... पण टिळकांचा पुतळा खंबीरपणे उभा आहे. यानंतर 1956 रोजी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. तिकडं पण मोठी हवा असते. तरीही तो पुतळा आज खंबीरपणे उभा आहे. पण आठ महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ महाराजांचा पुतळा बसवला तो कोसळला. चांगल्या मनानं तो पुतळा बनवला नव्हता. त्यामुळं तो पुतळा कोसळला. महाराष्ट्राच्या भावनेशी तुम्ही खेळताय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे," असं संजय राऊत म्हणाले.

तर बहिणी लाडक्या कशा होतील? :सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निलंबित केलं पाहिजे. या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही लाखो-कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडायचं. "छत्रपती शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत, तर त्यांच्या बहिणी लाडक्या कशा होतील?" असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. "या घटनेचा महाराष्ट्राला संताप आला आहे आणि आम्ही महाविकास आघाडी शांत बसणार नाही. याचा आवाज उठवून धरू आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचू. या सरकारच्या डोक्यात हवा गेलेली आहे. ही हवा जास्त दिवस टिकणार नाही," अशी खोचक टीका संजय राऊतांनी महायुती सरकारवर केली.

हेही वाचा :

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल, नौदलानं स्थापन केली चौकशी समिती - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. "शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले भक्कमपणे उभे, पण..." महाविकास आघाडीचा महायुतीवर निशाणा - statue of chhatrapati shivaji

ABOUT THE AUTHOR

...view details