महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बायोगॅस प्रकल्पाची किमया भारी, शेतकऱ्याला थेट राष्ट्रपतींकडून प्रजासत्ताक सोहळ्याचं निमंत्रण! - REPUBLIC DAY 2025

आदिवासी दुर्गम भागातील रामचंद्र गणपत भोजणे या शेतकऱ्याला थेट प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याकरिता राष्ट्रपती भवनकडून निमंत्रण आलं आहे. या शेतकऱ्यानं किमया कशी साधली? वाचा, सविस्तर

republic day 2025
शेतकऱ्याला प्रजासत्ताक दिनाचं निमंत्रण (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2025, 11:10 AM IST

Updated : Jan 21, 2025, 2:32 PM IST

अहिल्यानगर- नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाला हजर राहण्याची अनेकांना इच्छा असते. पण, जर राष्ट्रपती भवनातूनच खास निमंत्रण मिळाले तर... निश्चितच आनंद आणि सुखद धक्का बसेल. हा अनुभव अहिल्यानगरमधील शेतकरी रामचंद्र गणपत भोजणे घेत आहेत. त्यांना राष्ट्रपती भवनकडून प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं आहे.

रामचंद्र गणपत भोजणे यांचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून जंगलातून लाकडं आणून चुलीवर घरातील स्वयंपाक करत आलेलं आहे. त्यांना राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर भोजणे या शेतकऱ्यानं राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजना आपल्या शेतात राबवली. याच प्रकल्पामुळे भोजणे या शेतकऱ्याला राष्ट्रपती भवनमधील खास कार्यक्रमाला हजर राहता येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हे शेतकरी अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी आहेत.

शेतकऱ्याला राष्ट्रपती कार्यालयाचं निमंत्रण कसं मिळालं? (Source- ETV Bharat Reporter)

राष्ट्रपती भवनमध्ये काय आहे कार्यक्रम?राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांची राष्ट्रपती कार्यालयाकडून निवड करण्यात आली आहे. त्यापैकी नांदेड येथील शेतकरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रामचंद्र भोजणे हे शेतकरी आहेत. भोजणे यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवन कार्यालयानं विशेष निमंत्रण पाठविलं आहे. भारतातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्ती अशा जवळपास 250 व्यक्तींची राष्ट्रपती भवनमध्ये होणाऱ्या 'एट होम 2025' स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी निवड केली आहे. या व्यक्तींना निमंत्रण पत्रिका पाठवून प्रजासत्ताक सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

शेतकऱ्याला थेट राष्ट्रपतींकडून प्रजासत्ताक सोहळ्याचं निमंत्रण (ETV Bharat Reporter)

डाक विभागाकडून सन्मानपूर्वक निमंत्रण पत्रिका-शासकीय लाभार्थी म्हणून निवड झालेले रामचंद्र भोजणे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती आहेत. ही निमंत्रण पत्रिका शनिवारी संगमनेर डाक विभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक संतोष जोशी, पोस्टमन वाकचौरे यांनी त्यांना सन्मानपूर्वक दिली. भारतातील सर्वोच्च कार्यालय राष्ट्रपती भवन यांच्याकडून झालेली निवड आणि विशेष निमंत्रण यामुळे भोजणे कुटुंबाला अतिशय आनंद झाला आहे. त्यांनी घराची अतिशय उत्तम सजावट केली आहे.

अशा पद्धतीनं उभारला बायोगॅस प्रकल्प-रामचंद्र भोजणे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांनी अर्धा गुठा क्षेत्रात सात फूट रुंद आणि साडेसात फूट उंच खोल खड्डे घेतले. यात हा राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प 2023-2024 साली उभारला आहे. भोजणे एसटीमध्ये येत असल्यानं सरकारनं त्यांना हा प्रकल्प उभारण्यासाठी 27 हजार रुपयं अनुदान दिलं. तर भोजणे यांनी स्वतःकडील 8 हजार रुपय खर्च केले आहेत. एकूण 35 हजार रुपयांमध्ये हा प्रकल्प उभा राहिला. हा प्रकल्प उभा केल्यानंतर घरी एक गाय होती. हे प्रमाण वाढून त्यांच्याकडं सध्या 8 गाई आहेत. दिवसभरात 8 ते 10 किलो गाईंचे शेण प्रकल्पासाठी वापरण्यात येते. घरातील स्वयंपाक आणि अंघोळीसाठी लागणारे गरम पाणी याकरिता प्रकल्पाचा वापर होत आहे.

बायोगॅस प्रकल्पामुळे गावात जनजागृती-राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्पामुळे आज कुटुंबीयांना मोठा फायदा झाला. त्यांना जंगलातून लाकडं आणून चुलीवर घरातील स्वयंपाक करण्याची गरज राहिली नाही. तर दुसरीकडे गॅस टाकीचे भाव गगनाला भिडल्यानं स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर घेण्याची गरज राहिली नाही. या राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेची गावात मोठ्या प्रमाणात भोजणे यांनी जनजागृती केली. त्याचाच परिणाम म्हणून गावातील इतर शेतकरी अशा पद्धतीनं प्रकल्प शेतात उभारत असल्याचं भोजणे यांनी सांगितलं.

अकोले तालुक्यात 24 शेतकऱ्यांनी घेतला लाभ-"केंद्र आणि राज्य सरकारच्या येणाऱ्या योजना आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. अकोले तालुक्यातील 24 शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांची यादी आमच्याकडून केंद्र सरकारच्या वतीनं मागवण्यात आली होती. त्यात रामचंद्र भोजणे यांची निवड करण्यात आली. त्यांची थेट राष्ट्रपती भवनकडून उपस्थित राहण्याचं निमंत्रण आलं," अशी माहिती अकोले पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती यांच्या हस्ते शेतकरी भोजणे या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात येणार आहे. दिल्लीपर्यंत जाण्याचा आणि येण्याचा सर्व खर्च हा राष्ट्रपती भवनच्या वतीनं करण्यात येणार आहे- अकोले पंचायत समिती कृषी अधिकारी, विकास चौरे

राष्ट्रपती भवनकडून करण्यात येणार सर्व खर्च-येत्या 25 जानेवारी रोजी शेतकरी रामचंद्र भोजणे आणि कृषी अधिकारी विकास चौरे हे दोघेही अकोले येथून मुंबईला चारचाकी वाहनाने रवाना होणार आहेत. मुंबई येथून थेट विमानानं दिल्लीला जाणार आहे. 25 जानेवारीला सायंकाळी राष्ट्रपती भवनात शाही भोजनाचा लाभ घेणार आहेत. तर मुक्कामदेखील राष्ट्रपती भवनात करणार आहेत.

हेही वाचा-

  1. प्रजासत्ताक दिनी कोण कुठं करणार ध्वजवंदन, मुख्यमंत्री कुठे करणार ध्वजवंदन?
  2. Amazon Great Republic Day Sale 2025 मध्ये बंपर ऑफर, 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस सूट
Last Updated : Jan 21, 2025, 2:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details