महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

''जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ब्रिटिशांच्या गाडीच्या पेट्रोल टाकीत साखर टाकायचो''; रतन टाटांचा 'तो' किस्सा चर्चेत

बीबीसीसाठी पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान रतन टाटा म्हणाले होते की, ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर ब्रिटिश वाहनांच्या इंधनाच्या टाक्यांमध्ये साखर टाकत असत.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 4 hours ago

ratan tata childhood story
रतन टाटांच्या लहानपणीच्या आठवणी (ETV Bharat File Photo)

मुंबई-कधी काळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याच काळात रतन टाटा यांचा जन्म झाला. 1937 मध्ये जन्मलेल्या रतन टाटा यांनी ब्रिटिश भारतातील त्यांच्या आठवणी शेअर केल्यात. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, लहानपणी भारताला गुलामीत पाहताना अस्वस्थ वाटायचे. त्यांना भारताचे स्वातंत्र्य पाहायचे होते. रतन टाटा यांचे घर तत्कालीन मुंबईतील आझाद मैदानाजवळ होते. रतन टाटा सांगतात की, ते अनेकदा त्यांच्या घराच्या बाल्कनीतून आझाद मैदानातील हालचाली पाहत असत. जिथे अनेकदा स्वातंत्र्यसैनिकांचं आंदोलनही व्हायचं, नेते यायचे आणि भाषणंही व्हायची आणि त्याच वेळी त्यांची ब्रिटिश सैनिकांशी चकमक व्हायची. रतन टाटा यांनी त्यांच्या घरातून अनेकदा लाठीचार्ज, दंगल आणि हिंसाचाराची चित्रे आझाद मैदानात पाहिली आहेत.

ब्रिटिशांच्या वाहनांच्या टाक्यांमध्ये साखर टाकायचो: बीबीसीसाठी पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान रतन टाटा म्हणाले होते की, ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर मिळून ब्रिटिश वाहनांच्या इंधनाच्या टाक्यांमध्ये साखर टाकत असत. खरं तर तो इंग्रजांविरुद्ध प्रतिकाराचा केलेला बालिश प्रकार होता, असंही त्यांनीच मान्य केलं होतं. "मला स्वातंत्र्य चळवळीतील अनेक गोष्टी आठवत नाहीत, पण दंगली आठवतात, माझ्या कुटुंबाचे घर आझाद मैदानाजवळच्या गल्लीत होते, या आझाद मैदानात अनेक सभा होत असत. लाठीचार्ज म्हटला तर मला आजही आठवतं की, मी माझ्या बाल्कनीतून हे सगळं पाहत असायचो." ब्रिटिशांनी भारत सोडून त्यांच्या देशात म्हणजेच इंग्लंडमध्ये परत जावे, अशी रतन टाटांची तेव्हा इच्छा होती. यासाठी ते त्याच्या मित्रांसोबत काही ना काही करामती करायचे. रतन टाटा म्हणाले होते की, "मला आठवतंय, आम्ही मुलं ब्रिटिश खासदारांच्या गाड्या आणि मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीत साखर टाकायचो, जेव्हाही आम्हाला संधी मिळेल, तेव्हा आम्ही अशा गोष्टी करायचो." रतन टाटा सांगत होते की, त्यांनी अनेक ब्रिटिश कारमधील पेट्रोलच्या टाकीत साखर टाकलीय.

टाक्यांमध्ये साखर टाकली तर काय? : खरं तर कोणत्याही वाहनाच्या इंधन टाकीमध्ये साखर टाकणे हे मशीन खराब करण्यासाठी पुरेसं आहे. साखर इंधन फिल्टर बंद करू शकते, इंधन पुरवठा खंडित करू शकते, तसेच इंजिन थांबवू शकते. साखर गाडीतील एअर फिल्टरला अडथळा आणू शकते, ज्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि इंजिनचे नुकसान होऊ शकते. एकंदरीतच एकदा साखर इंजिनामध्ये गेली तर ते बंद होणारच आहे.

ब्रिटिश राजघराण्याशी जवळचे संबंध : खरं तर रतन टाटा यांचं कुटुंबसुद्धा ब्रिटिश राजघराण्याच्या प्रभावापासून दूर राहिलेलं नाही. रतन टाटा यांचं संगोपन त्यांच्या आजीनं केलं. आजी उच्चभ्रू पारशी कुटुंबातील असल्याने त्यांच्या आजीला ब्रिटिश राजघराण्याशी जुळवून घ्यावे लागले. रतन टाटा स्वतः म्हणायचे, "होय, माझ्या आजीचे ब्रिटीश राजघराण्याशी जवळचे संबंध होते. माझी आजी आणि सर रतन टाटा हे राणी मेरी आणि किंग जॉर्ज पंचम यांच्या खूप जवळचे होते." रतन टाटांनी इंग्लंडला जाऊन चार्टर्ड अकाउंटंट म्हणून शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, परंतु रतन टाटा बंडखोर होते, त्यांना अमेरिकेत जाऊन आर्किटेक्चर आणि इंजिनीअरिंगचा अभ्यास करायचा होता. परंतु त्यांच्या वडिलांना हे आवडले नाही. तरीही कसे तरी रतन टाटांनी आपले स्वप्न पूर्ण केले आणि अमेरिकेत आर्किटेक्चर आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी 1959 मध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतले आणि 1962 मध्ये बीआरए (स्थापत्यशास्त्र बॅचलर) पदवी प्राप्त केली. कॉर्नेल युनिव्हर्सिटीतील प्रवासानं रतन टाटा यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणले होते, असं रतन टाटा सांगतात. टाटा ब्रँडच्या नावाला तिथे काहीच महत्त्व नव्हतं. कारण 20 हजार विद्यार्थ्यांमध्ये तेसुद्धा एक विद्यार्थीच होते.

रतन टाटा अमेरिकेच्या प्रेमात :रतन टाटा सांगतात की, "त्या दिवसांत जेव्हा कोणताही भारतीय परदेशात शिकायला जायचा, तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून फारच कमी भत्ता दिला जायचा आणि मी अमेरिकेत श्रीमंत भारतीय नसून एक धडपडणारा विद्यार्थी होतो. मला माझा पुढचा चेक कधी येईल, याची काळजी वाटत होती. रतन टाटा लवकरच अमेरिकेच्या प्रेमात पडले. खरं तर लहानपणापासूनच त्यांना या शहराची ओढ होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांना परतायचं नव्हतं. पण नियतीमध्ये काही वेगळंच लिहिलं होतं. रतन टाटा त्यांच्या आजीच्या हाकेमुळे पुन्हा मायदेशी परतले, खरं तर रतन टाटांच्या आजीनं त्यांच्यासाठी आईची भूमिका निभावली होती अन् त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

हेही वाचा-

  1. भारताचे अनमोल 'रतन' हरपले, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  2. दुर्मिळ रत्न हरपले...रतन टाटांच्या निधनानं संपूर्ण देशात शोककळा, राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं दु:ख
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details